उजनी धरणात अवघे 30 TMC पाणी! सोलापूरच्या औज बंधाऱ्याने गाठला तळ; उजनीचे पाणी उद्या बंधाऱ्यात पोचणार; सोलापूर शहराचा पाणीपुरवठा कसा, जाणून घ्या

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला असून अवघे दोन-तीन दिवस पुरेल इतकेच पाणी सध्या त्यात शिल्लक आहे. दुसरीकडे उजनीतून भीमा नदीद्वारे सोडलेले पाणी सोमवारी माचणूरच्या पुढे आले होते. बुधवारी (ता. २०) उजनीचे पाणी औज बंधाऱ्यात पोचेल.
उजनी धरण
उजनी धरणSakal

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला असून अवघे दोन-तीन दिवस पुरेल इतकेच पाणी सध्या त्यात शिल्लक आहे. दुसरीकडे उजनीतून भीमा नदीद्वारे सोडलेले पाणी सोमवारी माचणूरच्या पुढे आले होते. बुधवारी (ता. २०) उजनीचे पाणी औज बंधाऱ्यात पोचेल. पण, गढूळ पाण्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होवू शकतो.

सोलापूर शहराला सध्या औज बंधारा व उजनी धरणावरील सोलापूर- उजनी पाईपलाइनमधून पाणीपुरवठा होतो. सध्या शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. केगाव, बाळे, देगाव, अवंती नगर, आदित्य नगर, जुळे सोलापूर, नई जिंदगी, श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसर, किनारा हॉटेल परिसर, गावठाणमधील विकास नगर, सोनी नगर, सात रस्ता परिसर, गुरुनानक चौक परिसर, आंबेडकर नगर, शिक्षक सोसायटी, बापूजी नगर, अशोक चौक, कर्णिक नगर, पद्मनगर, कुचन नगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसर, विडी घरकूल, शेळगी ते दहिटणे परिसर अशा विविध भागाला टप्प्याटप्याने चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उजनी-सोलापूर पाईपलाइन दुरुस्तीमुळे काही भागातील तर औज बंधारा कोरडा पडल्यावर किंवा पाईपलाइन नादुरुस्त झाल्यावर काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो.

सध्या उजनी धरण तळ गाठत असल्याने पाणी काहीसे गढूळ येत असल्याचे यापूर्वी पहायला मिळाले. आता नदीतून औज बंधाऱ्यात आलेले पाणी देखील गढूळ असल्यास औज बंधाऱ्यावरून होणारा पाणीपुरवठा देखील गढूळ असू शकतो, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेकडून यापूर्वीच करण्यात आले आहे. दरम्यान, उजनीचे पाणी औज बंधाऱ्यात पोचल्यावर पुढील ४५ ते ५० दिवस शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे. पण, मे महिन्यात पुन्हा एकदा सोलापूरसाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार असून तीव्र उन्हाळ्यामुळे त्यावेळी अंदाजे सात टीएमसी पाणी लागू शकते.

उजनी धरण उणे २८ टक्के

यंदाच्या पावसाळ्यात ६० टक्के भरलेले उजनी धरण सध्या उणे २८ टक्क्यांपर्यंत आले असून धरणात सध्या मृतसाठ्यातील ४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पण, त्यात जवळपास १८ ते १९ टीएमसी गाळ असून राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्बंधानुसार पूर्ण पाणी उपसा करता येत नाही. दुसरीकडे उजनी धरणावर अनेक गावांसह शहरांचा व एमआयडीसींचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार हे निश्चित मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com