पालघर - केंद्र व राज्यातील सरकारकडून आश्वासनांची खैरात सुरू असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने असंवेदनशील सरकारविरोधात कॉंग्रेसने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी राज्यात 26 जानेवारीला संविधान बचाव रॅली आयोजित केल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत व प्रमुख शहरांमध्ये पक्षातर्फे "व्हिजन 2019' शिबिरांचे 15 एप्रिलपर्यंत आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी या वेळी दिली. "सरकारी योजना, परराष्ट्र धोरण, शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगारनिर्मिती आदींबाबत सरकार अपयशी ठरले असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्याची सरकारची भूमिका संशयास्पद आहे. आगामी 2019च्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना मजबूत करणे, गटबाजी आणि हेवेदावे संपुष्टात आणणे, परिसरात समस्या व इतर विषय समजून घेणे आणि विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणे आदींची आखणी शिबिरांमध्ये करण्यात येणार आहे. येत्या 26 जानेवारीला संविधान बचाव मार्च आयोजित केल्यानंतर एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान मतदारसंघनिहाय संघर्ष यात्रा काढण्यात येतील.
त्याचबरोबर विभागनिहाय राजकीय स्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
|