रात्रीच्या वेळी होताहेत दारूच्या पार्ट्या; संतापाचे वातावरण
पंढरपूर - चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटाचा वापर तळीरामांकडून चक्क पार्ट्यांसाठी केला जाऊ लागला आहे. दररोज रात्री वाळवंटात ठिकठिकाणी दारू पित गटागटाने बसलेले तरुण पाहून वारकरी मंडळींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहर हद्दीतील पाच आणि शहरालगतची सहा परमिट रूम, एक वाइन शॉप, एक बिअर शॉपी बंद करण्यात आली. पंढरपुरात सध्या एक वाइन शॉप व पाच परमिट रूम सुरू आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून शहरात नवीन वाइन शॉपचा परवाना देणे शासनाने बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर परमिट रूममध्ये जाऊन जादा पैसे खर्च करून दारू पिण्याऐवजी वाइन शॉपमधून दारू घेऊन शहरातील पटांगणे, मैदाने येथे बसून दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशा मंडळींपैकी अनेकांनी दारू पिण्यासाठी आता चंद्रभागेच्या वाळवंटाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच घाटांच्या जवळील पानपट्ट्यांतून प्लॅस्टिकचे ग्लास, वेफर्स, थंड पाण्याच्या बाटल्या आणि पाउच मिळू लागले आहे. वाइन शॉपमधून दारू घेऊन आलेली मंडळी घाटांच्या जवळील पान दुकानातून थंड पाणी आणि ग्लास विकत घेऊन वाळवंटात पार्ट्या रंगवत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अशा टोळक्यांच्या संख्येत वाढ होत चालली असल्याचे वाळवंटात फिरण्यास जाणाऱ्या लोकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. यासंदर्भात एका परमिट रूमचालकास विचारले असता ते म्हणाले, परमिट रूम व वाइन शॉपच्या दरात सुमारे 40 ते 45 टक्के फरक असतो. त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी संबंधित मंडळी वाइन शॉपमधून दारू विकत घेऊन जागा मिळेल तिथे जाऊन पितात.
शहरातील तळीरामांची ठिकाणे
येथील रेल्वे मैदान, नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरवरची टेरेस, यमाई तळ्याचा परिसर या ठिकाणांचा वापर दारू पिणाऱ्यांकडून दररोज रात्री केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या बाटल्या जागोजागी पडल्याचे चित्र दिसत आहे.
चंद्रभागा नदी आणि वाळवंटाविषयी वारकऱ्यांच्या मनात अपार श्रद्धा आहे. वाळवंट स्वच्छ राहावे, म्हणून वाळवंटात वारकऱ्यांना तंबू अथवा राहुट्या उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी पोलिस आणि प्रशासनाकडून केली जाते आणि दुसरीकडे त्याच चंद्रभागेच्या वाळवंटाचा वापर दारू पिण्यासाठी होतो आहे हे अतिशय दुर्दैवाचे आहे. या प्रकाराकडे पोलिस आणि प्रशासनाकडून कानाडोळा होत आहे. हा प्रकार तत्काळ थांबला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
- ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अध्यक्ष, वारकरी फडकरी संघटना
|