students
studentssakal media

पालकांनो, तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवायचायं का? मग ‘या’ पंचसूत्रीचे पालन करा, नक्कीच बदल जाणवेल

‘तु वेडा आहेस, तुला काही समजत नाही’ असे वारंवार म्हटल्याने मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. एखादे काम परिपूर्ण करू न शकल्यामुळे रागावून बोलण्याची सवय पालकांनी सोडावी. गैरवर्तनामुळे मुलांमध्ये नकारात्मकता येते, त्यांच्या मानसिक स्तरावरही परिणाम होतो.

सोलापूर : ‘तु वेडा आहेस, तुला काहीच समजत नाही’ असे वारंवार म्हटल्याने मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. एखादे काम परिपूर्ण करू न शकल्यामुळे रागावून बोलण्याची सवय पालकांनी सोडावी. पालकांच्या गैरवर्तनामुळे मुलांमध्ये नकारात्मकता येते, ज्यामुळे त्यांच्या मानसिक स्तरावरही परिणाम होतो. लहान मूलही गैरवर्तन करायला शिकते, त्यामुळे मुलांना शिवागाळ करू नका. दोन मुलांची तुलना करू नका. त्यामुळे मुले न्यूनगंडाची शिकार होऊ शकतात. याशिवाय त्यांच्या मनात समोरच्याबद्दल मत्सराची भावना निर्माण होईल. मुलांना नेहमी कमकुवत किंवा कमी लेखू नये. त्यांना योग्य शब्दात समजावून सांगावे. जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याला यशाचा मार्ग सापडेल.

पंचसूत्री पाळा, मुलांमध्ये निर्माण होईल आत्मविश्वास

१) मुलांना गुणात्मक वेळ द्यावा

मुले आई- बाबांच्या सहवासात जास्त मोकळेपणाने वागतात. त्यासाठी त्यांनी मुलांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. त्यावेळी मुलांच्या आवडी निवडी समजतात आणि त्यास खतपाणी भेटते. आपल्या आवडीच्या गोष्टी मुलांना करायला मिळाल्या तर मुले आनंदाने, मोकळेपणाने कामे करतात. आई- वडिलांचा गुणात्मक वेळ मुलांना मिळाला तरच मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

----------------------------

२) आम्ही सोबत असल्याचा विश्वास द्या

मुलांना आई- बाबांचा विश्वासही हवा असतो. आम्ही तुझ्यासोबत आहोत या विश्वासने मुलांना मानसिक बळ मिळते. आपल्याला एखादी गोष्ट जमो अथवा न जमो आई- बाबा सोबत असणारच, या विश्वासाने मुलांमध्ये कृती करण्याचे धैर्य निर्माण होते. आई- बाबांसोबत असलेले भक्कम नाते मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते.

-----------------------------

३) मुलाची तुलना इतरांशी करू नका

मुले जे करतात त्यात आई- बाबांकडून प्रोत्साहन मिळाल्यास मुले आवडीने त्या गोष्टी करतात. पण, मुलांनी केलेल्या गोष्टींना नावं ठेवली, त्यांची तुलना त्यांच्याच वयातल्या इतर मुलांशी केली तर संकोचपणा निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. या गोष्टीचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होतो. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात.

-----------------------------------------

४) चांगल्या कामाचे मनभरून कौतुक करा

मुलांच्या कामाचे मोठ्यांनी कौतुक केल्यास त्यांचा आत्मविश्वास बळावतो. सोप्या कामाकडून अवघड कामाकडे वळण्याची प्रेरणा मुलांमध्ये निर्माण होते. शालेय जीवनातील स्पर्धात्मक प्रक्रियेला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात येते. पण, मुलांना मोठ्यांकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकायला न मिळाल्यास त्यांची रुची, आवड, आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे छोट्या- छोट्या कामांसाठी पालकांनी त्यांचे कौतुक करावे. जेणेकरून आत्मविश्वास वाढतो.

---------------------------------

५) नवनवीन ठिकाणी मुलांसोबत फिरायला जा

मुलांना मधून- मधून बाहेर घेऊन जाण्यामुळे त्यांना नवीन जागेची तथा ठिकाणांची, नवीन गोष्टींची माहिती मिळते. त्यातून त्यांचे ज्ञानही वाढते. माहिती आणि ज्ञान वाढल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. फिरल्यामुळे त्यांचा बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासही होतो.

योगामुळे सकारात्मकता येते अन्‌ एकाग्रताही सुधारते

जागरण, स्क्रिनच्या अतिवापरामुळे बहुतेक मुलांचे मानसिक स्वास्थ बिघडत आहे. त्यामुळे त्यांची एकाग्रता कमी झाली आहे. प्राणायाम, आसनांमधून स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. नैसर्गिक झोपेचे चक्रही त्यातून सुधारू शकते. योगातील अष्टांगांपैकी यम आणि नियम, या दोन्हीचे पालन केल्यास प्रत्येकाचे आयुष्य निश्चितपणे बदलून सकारात्मकता येते. सामाजिक विकृती कमी करण्याचे सामर्थ्य देखील त्यात आहे, असा विश्वास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आरोग्यविज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. अभिजित जगताप यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com