खोट्या आश्‍वासनांनी सत्ता मिळविणे हा देशद्रोह

खोट्या आश्‍वासनांनी सत्ता मिळविणे हा देशद्रोह

शिर्डी - ‘‘येथील जनतेला ‘कसं काय, बरं आहे ना,’ असे मराठीतून विचारणाऱ्या पंतप्रधानांना ‘अजिबात बरं नाही,’ असे सांगण्याचे धाडस फक्त महाराष्ट्रातील जनताच करू शकते. राममंदिर उभारणी, ३७० वे कलम हटविणे आणि समान नागरी कायदा ही आश्‍वासने ‘चुनावी जुमला’ होती, हे भाजपने जाहीर करावे. खोटी आश्‍वासने देऊन सत्ता मिळविणे हा देशद्रोह आहे,’’ अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.  येथून लोकसभेची उमेदवारी पुन्हा  खासदार सदाशिव लोखंडे यांनाच मिळेल, असे जाहीर केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम, मिलिंद नार्वेकर, खासदार लोखंडे, आमदार सुनील शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी निळवंडे  कृती समितीच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा आसूड भेट देऊन सत्कार 
करण्यात आला.

ठाकरे म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी खोटी जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करतात. त्यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, उज्ज्वला गॅस, घरकुले याबाबत फसवे दावे केले जातात. 

जनतेकडून खोटे वदवून घेणारी जाहिरातबाजी करणाऱ्यांचे बुरखे फाडून वास्तव लोकांसमोर आणण्याचे काम शिवसेनेच्या गटनेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी करावे. मराठा व धनगर आरक्षणाला आपला पाठिंबा आहे.’’

ते आमच्या लोकसभा मतदारसंघात घुसखोरी करणार असतील, तर आम्ही स्वस्थ कशाला बसू?, असा सवाल करून ते म्हणाले, ‘‘खासदार लोखंडे शेतकऱ्यांबरोबर उपोषणास बसतात. ते कधीही व्यक्तिगत काम घेऊन माझ्याकडे आले नाहीत. त्यांना पुन्हा दिल्लीत पाठवायचे आहे. राधाकृष्ण विखे पाटील गुळमुळे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com