12वीच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया युध्द पातळीवर पूर्ण करणार : खंडागळे

HSC Students
HSC Students

मुंबई : यंदा १२ वीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक असणाऱ्या छायांकित प्रतीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या संदर्भात तातडीची पावले उचलली आहेत. विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र पाच काऊंटर्स कार्यान्वित करण्यात आले असून ही प्रक्रिया युध्द पातळीवर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भात मंडळाला आदेश दिल्यानंतर पुनर्मूल्यांकन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबाबत योग्य ती काळजी घेतली जाईल, असेही खंडागळे यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षीपेक्षा यंदा मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. त्यामुळे या कामी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कायम आस्थापनेकडून सुमारे 15 कर्मचारी व इतर 30 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत उत्तरपत्रिका पडताळणीच्या कामासाठी सुमारे 80 शिक्षक नेमण्यात आले असून, मंडळ आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या पुनर्मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती खंडागळे यांनी यावेळी दिली.

विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. आज (सोमवार) दुपारपर्यंत एकूण 7864 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी गुणपडताळणीसाठी 1777, तर पुनर्मूल्यांकनासाठी 6087 अर्ज प्राप्त झाले आहेत. गुणपडताळणी व छायांकित प्रतीसाठी मंडळाकडे अर्ज दाखल झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळेपर्यंत सुमारे 8 दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती खंडागळे यांनी दिली.

12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत प्रवेश घेणारे विद्यार्थी एक वर्षभरातच प्रवेश बदलत होते. ही वस्तुस्थिती निदर्शनास आल्यानंतर विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यंदा परीक्षा पद्धतीचा पॅटर्न बदलण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा प्राप्त झालेले गुण हे बदललेली मूल्यमापन पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमतेनुसार मिळाले असल्याचेही खंडागळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com