पुणे - कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर गेल्या तीन दिवसांपासून असलेले पावसाचे सावट आता दूर झाले असून, थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे गुरुवारी नोंदविण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यातील ढगाळ वातावरण कमी झाले असून बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. अंदमान निकोबार समुद्रालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या अग्नेय बाजूबरोबर पूर्वमध्य समुद्रालगत पसरले आहे. या क्षेत्राचा प्रभाव कमी झाला असून, राज्यातील आर्द्रतेचे प्रमाण घटले आहे.
परिणामी, गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. मध्य महाराष्ट्रात गुरुवारी काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर पुढील चोवीस तासांमध्ये राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडीच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागातील तापमान सरासरीच्या जवळपास होते.
|