मुंबई - येत्या नवीन वर्षात राज्यातील 52 नद्यांचे शुद्धीकरण मोहिमेचे काम सुरू होणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी सांगितले. ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.
कदम म्हणाले, 'अलीकडेच चंद्रभागा नदी स्वच्छ केली. या मोहिमेत जवळपास 500 नागरिक आणि अधिकारी सहभागी झाले होते. लवकरच तेथील गाळ काढणार आहोत. चंद्रभागेत आजूबाजूच्या 121 गावांचे सांडपाणी सोडले जाते. ते अडवणार आहोत. त्यासाठी 20 कोटी रुपये दिले आहेत. नदीकाठी भक्तांसाठी स्वच्छतागृहे, अंघोळीसाठी घाट बांधणार आहोत.''
कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासंदर्भात ते म्हणाले, की राज्यातील 227 नगर परिषदा आणि 27 महानगरपालिका क्षेत्रांतील कचरा आणि शेण एकत्र करून सेंद्रिय खत निर्माण करणार आहोत. हे खत शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना रसायनयुक्त धान्यापासून मुक्ती मिळेल. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर भीमा, गोदावरी, पंचगंगा, उल्हास, मीठी या व इतर जवळपास 52 नद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम पर्यावरण विभागाने हाती घेतली आहे, असेही ते म्हणाले.
प्रधान सचिव अनिल डिग्गीकर म्हणाले, की पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने जगभर प्रलयकारी घटना घडत आहेत. तापमान वाढ, सुनामी, महापूर ही त्याची उदाहरणे आहेत. राज्यात सुरू असलेल्या प्लॅस्टिक बंदीला 90 टक्के प्रतिसाद मिळाला असून, पुढच्या सहा महिन्यांत संपूर्ण प्लॅस्टिक बंदी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
|