रेल्वे पोलिस भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक
सोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक संवर्गाच्या एक हजार 117 जागांची भरती काढली. त्यासाठी दोन ते तीन लाखांपर्यंत अर्ज अपेक्षित होते, मात्र तब्बल 14 लाख 71 हजार उमेदवारांनी अर्ज केले. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज महाराष्ट्रातील असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या भरतीतून महाराष्ट्रासह देशातील बेरोजगारीची जाणीव झाल्याचेही त्यांनी सांगितले. बॅंकांसह महापालिका, जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षण यांसह अन्य शासकीय विभागांमधील भरती मागील काही वर्षांपासून ठप्पच आहे. महाराष्ट्रासह देशातील कोट्यवधी तरुण-तरुणी नोकर भरतीच्या जाहिरातीकडे डोळे लावून बसले आहेत. आतापर्यंत पोलिस शिपाई भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत होते, परंतु पोलिस उपनिरीक्षक पदासाठी एवढे अर्ज यायची पहिलीच वेळ असल्याचेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. "स्टार्टअप' असो की "स्टॅण्डअप' या योजनांमधून अपेक्षेप्रमाणे उद्योगच सुरू न झाल्याने रोजगार निर्मितीत घट झाल्याचा परिणाम या भरतीच्या माध्यमातून पाहायला मिळाला, असेही ते म्हणाले.
भरतीसाठी...
रेल्वे पोलिस उपनिरीक्षक (पुरुष)
816 पदे
12.40 लाख अर्ज दाखल
रेल्वे पोलिस उपनिरीक्षक (महिला)
301 जागा
2.31 लाख अर्ज दाखल
|