जलाशयांमध्ये 66 टक्के साठा, खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी
पुणे - राज्यात आजअखेर सरासरी 823 मिलिमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या 86.1 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयांमध्ये 66.1 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, यंदाच्या खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्यात गतवर्षी याच सुमारास 748.9 मिलिमीटर म्हणजेच 78.3 टक्के पाऊस झाला होता.
राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामध्ये पुण्यासह ठाणे, रत्नागिरी, पालघर, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशीम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 16 जिल्ह्यांमध्ये 75 ते शंभर टक्के यादरम्यान पावसाची नोंद झाली आहे. त्यात रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नगर, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे, तर 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झालेल्या सात जिल्ह्यांमध्ये नाशिक, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
खरीप पेरणी 97 टक्के
राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140.69 लाख हेक्टर आहे. 31 ऑगस्टअखेर 135.90 लाख हेक्टर क्षेत्रावर (97 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच, ऊस पिकासह असणाऱ्या 149.74 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 137.63 लाख हेक्टर म्हणजेच 92 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना 31 ऑगस्टअखेर 15.86 लाख क्विंटल (97 टक्के) बियाणे पुरवठा करण्यात आला आहे.
विभागनिहाय उपलब्ध पाणीसाठा (कंसात गतवर्षीचा साठा)
कोकण- 93.07 टक्के (93.96)
पुणे- 87.28 टक्के (85.34),
नाशिक- 63.21 टक्के (71.71),
अमरावती- 54.16 टक्के (26.37),
नागपूर- 48.51 टक्के (33.10)
औरंगाबाद विभाग- 29.21 टक्के (45.42)
राज्यात 311 टॅंकरने पाणी
राज्यात ऑगस्टअखेर 311 टॅंकर्सद्वारे 309 गावे आणि 322 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 149 गावांना 158 टॅंकर्सने, तर जालना जिल्ह्यातील 18 गावे आणि तीन वाड्यांसाठी 24 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
|