सोलापूर - 'कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर झालेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या "महाराष्ट्र बंद'चे श्रेय घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावे, मी आपला गल्ली- बोळाचाच नेता बरा,'' अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केली.
सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. "एमआयएम' आणि "भारिप'ने स्थापन केलेली वंचित आघाडी वंचितांना पुन्हा एकदा सत्तेपासून वंचित ठेवणार आहे. कॉंग्रेसला मिळणारी दलित व मुस्लिमांची मते वंचित आघाडीला मिळणार असल्याने या मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा भाजपला व आमच्या रिपब्लिकन पक्षाला होईल, असा अंदाजही आठवले यांनी व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने महाराष्ट्रातील दोन ते तीन जागांची मागणी केली जाणार आहे. दक्षिण मुंबई, सोलापूर, रामटेक, सातारा, लातूर यापैकी दोन जागांची आम्ही मागणी करणार आहोत. दक्षिण मुंबईमधून आपण स्वतः 2019 ची लोकसभा लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मीसुद्धा जाणार अयोध्येत
शिवसेनेने जरी पहिले मंदिर फिर सरकारची घोषणा दिली असली, तरीही न्यायालयाने सुनावणीसाठी दिलेली तारीख पाहता पहिले सरकार फिर मंदिर यादृष्टीने काम करणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी सांगितले. संसदेच्या अधिवेशनानंतर आपणदेखील अयोध्येचा दौरा करणार असून तेथील बौद्ध, मुस्लिम आणि हिंदूंशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
आठवले म्हणाले...
- संविधानाला वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मी खंबीर
- कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'ने पक्ष बचाव मोहीम राबवावी
- महामंडळाचे अध्यक्ष व राज्यातील एक मंत्रिपद आम्हाला मिळणार
|