संचमान्यतेपूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी! मधूनच शाळा बदललेल्या विद्यार्थ्यांची होणार पडताळणी; इयत्ता अकरावी-बारावीसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन

आपल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत, प्रस्तावित नवीन पदे धोक्यात येणार नाहीत, याची खबरदारी घेत अनेकजण खासगी स्वयंअर्थसहाय्यिता किंवा विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी आपलेच असल्याचे भासविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तशा काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत.
schools

schools

sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : डिसेंबरअखेर सर्व शाळांची संचमान्यता अंतिम केली जाणार आहे. आपल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत, प्रस्तावित नवीन पदे धोक्यात येणार नाहीत, याची खबरदारी घेत अनेकजण खासगी स्वयंअर्थसहाय्यिता किंवा विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी आपलेच असल्याचे भासविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तशा काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिऱ्यांच्या माध्यमातून शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती पडताळली जात आहे.

शालेय शिक्षण विभागाने एका शिक्षकासाठी किती पटसंख्या असावी, हे १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार निश्चित केले आहे. या शासन निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होतील, भविष्यात शिक्षक भरती होणार नाही, या कारणाने या निर्णयाला विरोध केला जात आहे. दरम्यान, २०२४-२५ व २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबविली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुदानित शाळांमध्ये सध्या किती विद्यार्थी शिकत आहेत? याची पडताळणी अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. संचमान्यता करताना २० ऑक्टोबरपूर्वी त्या शाळांमधील प्रवेशित विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत.

तरीपण, काही शाळांनी मागच्या तारखा टाकून ते विद्यार्थी आमच्याच शाळांमधील असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांनी पहिल्या सत्राची परीक्षा, परीक्षेचा निकाल, सध्याची वर्गातील उपस्थिती, जूनपासूनचे हजेरीपत्रक, या बाबींची पडताळणी करावी, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. परभणी जिल्ह्यात असा प्रकार समोर आला असून त्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

...तर दाखल होईल थेट फौजदारी गुन्हा

मुख्याध्यापकांनी भरलेल्या माहितीनुसार त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटीतून पडताळणी केली आहे. त्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती, यापूर्वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी व निकालपत्रक, शाळा सुरू झाल्यापासूनची हजेरी याचीही तपासणी करण्यात आली आहे. कोणी बोगस पटसंख्या दाखविल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई होईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

अकरावी-बारावीसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन

अंशत: अनुदानित व अनुदानित शाळांना अधिकारी भेटी देणार असून ते इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची पडताळणी करणार आहेत. संचमान्यता अंतिम करण्यापूर्वी ही पडताळणी होणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांची प्रत्यक्षातील उपस्थिती, हजेरीपत्रकावरील उपस्थिती, विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी तपासली जाणार आहे. त्यानुसार जेवढे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित, तेवढीच पटसंख्या ग्राह्य धरून संचमान्यता केली जाणार आहे.

शाळा बदल झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी

शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला विद्यार्थी नोंदणी एका शाळेत आणि काही महिन्यानंतर त्या विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या शाळेत नोंदलेली दिसतात. अशा विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलमधून स्वतंत्रपणे बाजूला काढली जाणार आहे. त्यानुसार केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी दोन्ही शाळांमधील रेकॉर्ड तपासून संबंधित विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांकडे त्यासंदर्भातील खातरजमा करतील, असेही शिक्षण उपसंचालकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com