परतीच्या पावसाचा मासेमारीला फटका 

परतीच्या पावसाचा मासेमारीला फटका 

अलिबाग : रायगड जिल्हयामध्ये गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. याचा फटका शेतकऱ्यांसह मच्छीमारांना देखील बसला आहे. उन्हामध्ये सुकत ठेवलेली मासळी अचानक परतीच्या पावसात भिजून गेली. त्यामध्ये मासळीला दुर्गंध पसरला. परतीच्या पावसात खराब झालेली मासळी टाकून देण्याची वेळ मच्छीमारांवर आली. जिल्हयातील मच्छीमारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

जून ते आँगस्ट या कालावधीत मासेमारीला बंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर मच्छीमारांनी मासेमारीला सुरुवात केली. मात्र अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली. त्यात पुन्हा बोटी किनारी लावण्याची वेळ मच्छीमारांवर आली. चार ते पाच दिवस पाऊस सुरुच राहीला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे मच्छीमारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मासेमारी करण्यास मच्छीमारांनी सुरुवात केली. सप्टेंबर महीन्यात मासळीही मच्छीमारांना समाधानकारक मिळाली. पापलेट, बोंबील, सुरमईसारखी मासळी बाजारात दाखल झाल्याने खवय्यांची मासळीसाठी गर्दी वाढली होती. पाऊस थांबल्याने मच्छीमारांनी बोंबील, मांदेलीसारखी ओळी मासळी ओट्यांवर सुकत लावण्यास सुरुवात केली. पाचशे रुपये रोजंदारावर कामगार घेऊन ओळी मासळी योग्य पध्दतीने सुकत लावण्याचे काम करण्यात आले. मासळी सुकवून झाल्यावर ती बाजारात नेण्याच्या तयारीत मच्छीमार होते. मात्र अचानक परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसात जिल्हयात धुमाकूळ घातला. शुक्रवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले.

शनिवारपासून विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडला. या पावसात सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली. त्यामुळे मच्छीमारांची मेहनत पाण्यात गेली. त्यात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी परतीच्या पावसात ओली होऊन खराब झाली. मासळीचा वास सर्वत्र पसरू लागला. त्यामुळे मच्छीमारांनी अखेर ही मासळी टाकून देण्याचे काम केले. सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी पाण्यात गेल्याने मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोट्यावधी रुपयांचा फटका मच्छीमारांना बसला असल्याचे रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी सांगितले. 


परतीच्या पावसात सुकवलेली मासळी भिजून प्रत्येक नाखवाचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. लाखो - करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. 
प्रभाकर पाटील, व्हाईस चेअरमन 
मार्तंड मच्छीमारास सहकारी सोसायटी, वरसोली 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com