"भाजपचं ईडीमध्ये जसं अस्तित्व दिसतं तसं कश्मीर खोऱ्यात दिसावं"

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

पोकळ भाषणे, आश्वासने व निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही व हिंदूंचे रक्षण होणार नाही

सध्या भाजप सर्वत्रच दिसतोय. फक्त कश्मीर खोऱ्यांत निरपराध्यांच्या हत्या सुरू असताना केंद्र सरकार, भाजपचे अस्तित्व दिसत नाही. भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पाटर्य़ांत, जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यायातही दिसावे. एवढेच नव्हे, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शांत’ करण्यासाठी ‘खासगी आर्मी’ उभारावी असे जाहीर सल्लेही त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात. कश्मीर खोऱयात सध्या दहशतवाद्यांकडून निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत. तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांची वाहव्वाच होईल, असं मत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.

''हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीच मध्यंतरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱयांना ‘जशास तसा’ धडा शिकविण्यासाठी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हय़ात ‘दंडा फोर्स’ म्हणजे खासगी आर्मी उभारावी, असे म्हटले होते. तुमचा हा ‘दंडा फोर्स’ देशातल्या गरीब आणि न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात वापरण्यापेक्षा कश्मीरातील दहशतवाद्यांविरोधात वापरा. कश्मीर खोऱयात सध्या दहशतवाद्यांकडून निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत. तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांची वाहव्वाच होईल,'' असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत. फक्त ते कश्मीर खोऱयात दिसत नाहीत. कश्मीर खोऱयात गेल्या चार दिवसांत भयंकर असा रक्तपात घडला आहे. सात नागरिकांना अतिरेक्यांनी दिवसाढवळय़ा ठार केले. दहशतवादी गावात घुसतात, ओळखपत्रे तपासून हिंदू किंवा शिखांना ठार करतात असे हत्यासत्रच सध्या कश्मीरमध्ये सुरू आहे. श्रीनगरला शाळेच्या महिला प्राचार्यांना अतिरेक्यांनी ठार केले. या प्राचार्या कश्मिरी शीख समाजाच्या होत्या. दीपक चांद नावाच्या शिक्षकास गोळय़ा घालून मारले. ते कश्मिरी पंडित होते. फक्त कश्मिरी पंडित, हिंदू, शीखच नाहीत, तर पोलीस खात्यात कर्तव्य बजावणाऱया मुस्लिम अधिकाऱयांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे. कश्मीर पुन्हा हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभे आहे. नोटाबंदी केल्यामुळे दहशतवाद थांबेल असे केंद्र सरकार सांगत होते. नोटाबंदीमुळे बनावट नोटांचे उत्पादन थांबेल व अतिरेक्यांची आर्थिक रसद तुटेल असे सांगितले गेले, ते खरे ठरले नाही. त्यानंतर 370 कलम हटवले. 370 कलम हटवल्याने खोऱयातील हिंसाचारालाच आळा बसेल व पाकड्यांचे धाबे दणाणेल, असा दावा केला जात होता. तोदेखील फोल ठरला, असेही अग्रलेखात म्हटलेय.

कश्मीर खोऱयातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक आणि हाताबाहेर जाताना दिसत आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून फुटीरतावाद्यांना जोर चढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार हे पाकड्यांचे पाप आहे व त्यांच्या मदतीने कश्मीरवर चढाई करू, असे पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या चिंधडय़ा कशा उडविणार आहात ते सांगा. पोकळ भाषणे, आश्वासने व निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही व हिंदूंचे रक्षण होणार नाही, अशी भितीही व्यक्त करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com