औरंगाबाद - राज्याच्या दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या निविदा अंतिम झाल्या आहेत. आगामी महिनाभरात या कंपन्यांना वर्क ऑर्डर देण्यात येऊन कामाला प्रत्यक्षात आरंभ होणार आहे.
706 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या एकूण लांबीपैकी 153 किलोमीटर लांबीचा रस्ता औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जाणार आहे. या दीडशे किलोमीटरच्या रस्त्याची उभारणी करण्यासाठी तीन कंपन्यांना कामे देण्यात आली आहेत. या पॅकेजमधील माळीवाडा आणि पळशी (श.) या गावांमध्ये जमिनींचा तिढा शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम होता. तो विषय मार्गी लागल्याने या दोन जिल्ह्यांतील भूसंपादन चांगलेच पुढे सरकले आहे. 90 टक्क्यांपर्यंत भूसंपादन झाल्यावर प्रत्यक्षात कामाला सुरवात करता येणार आहे. हे चित्र पाहता आगामी महिनाभराच्या कालावधीत 153 किलोमीटरच्या टप्प्यात काम करणाऱ्या तीन कंपन्यांना वर्क ऑर्डर दिली जाणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
एकूण काम 5,177 कोटींचे
जालना, औरंगाबाद या दोन जिल्ह्यांतील कामाचे तीन भाग करण्यात आले आहेत. यातील न्हावा ते गेवराईपर्यंतच्या 42 किलोमीटरच्या रस्त्याचे काम मोंटोकार्लो या कंपनीकडे आहे. त्यापुढे गेवराई ते फतियाबाद हा 54 किलोमीटरचा रस्ता मेगा इंजिनिअर्स उभारणार असून, फतियाबाद ते सुराळादरम्यानचा 57 किमी रस्ता एल अँड टी कंपनी करणार आहे. या कामांसाठी अनुक्रमे 1310, 1772 आणि 2095 कोटी रुपये एवढी किंमत, तर एकूण 5177 कोटींची किंमत सरकार मोजणार आहे.
|