सांगली - माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने केवळ समिती स्थापनेचा सोपस्कार पार पाडला. त्यानंतर काहीच काम झाले नाही. सांगलीतील त्यांच्या स्मारकाच्या निधीचा प्रश्नही लटकला आहे. याप्रकरणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना तातडीने बोलेन, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगितले.
औदुंबर येथील साहित्य संमलेनाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर असलेल्या राज यांनी वसंतदादांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील या वेळी सोबत होते. त्या वेळी प्रतीक पाटील यांनी वसंतदादा स्मारकाविषयी माहिती दिली. यंदा दादांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त सांगलीत घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
राज ठाकरे यांनी दादांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य सरकारकडून काही कार्यक्रम झाले नाहीत आणि स्मारकाच्या निधीचाही प्रश्न कानी आला आहे, मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे सांगितले. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी याची माहिती दिली, असेही त्यांनी सांगितले. त्यावर प्रतीक यांनी हा प्रश्न तुम्ही स्वतःहून मांडताय असे सांगा. आम्ही तक्रार केली असे त्याला स्वरूप येऊ नये, अशी विनंती केली.
|