
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. पण भाजपाचे सर्व उमेदवार बाहेरचे आहेत असं ते म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे पुढचे २५ वर्षे मुख्यमंत्री असतील असा दावा त्यांनी केला आहे.
(Sanjay Raut On Rajyasabha Polls)
राज्यसभेच्या सातव्या जागेवर ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांना या राज्यात घोडेबाजार करायचा आहे असं दिसतंय, त्यांच्याकडे खरंतर एवढे मत नाहीत असं राऊत म्हणाले. भाजपने आधी छत्रपतींना पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि कोल्हापूरातल्या दूध आणि साखरसम्राटाला उमेदवारी दिली. ज्यांना उमेदवारी दिली ते महाराष्ट्रातील नाहीत त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे असा दावा शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपने पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षाच्या बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे असं राऊत म्हणाले. भाजपने जे उमेदवार दिले आहेत ते मुळात त्यांच्या विचारधारेचे नाहीत, ते संघाचेही नाहीत किंवा भाजपाचेही नाहीत. ते कधी शिवसेनेचे तर कधी दुसऱ्या पक्षाचे राहिले आहेत त्यामुळे भाजपने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं आहे अशी टीका भाजपवर केली आहे.
औरंगाबाद येथे ७ जूनला शिवसेनेची सभा होणार आहे, ती रेकॉर्डब्रेक होईल, आमच्या सभेने मराठवाड्यातील वातावरण ढवळून निघेल असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान सर्व पक्षाने राज्यसभेसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. तर भाजपने सातव्या जागेसाठी उमेदवार उभा केला असून त्यांच्याकडे मत कमी असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.