सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन गुंडाळले 

सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन गुंडाळले 

मुंबई - भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईतील सुरक्षेच्या कारणास्तव अर्थसंकल्पी अधिवेशन आज आटोपते घेण्यात आले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करून याची माहिती दिली. हे अधिवेशन सुरक्षेच्या कारणास्तव संपुष्टात येत असले, तरी कोणीही काळजी करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे. 

हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सध्या पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यांना भारतात ताबडतोब परत आणण्याचा ठरावही या वेळी मंजूर करण्यात आला असून, राज्यपालांमार्फत तो ठराव राष्ट्रपतींना देण्यात येणार आहे. 

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होते, त्यामुळे विधानभवन आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबईत सुरक्षेची गरज असून, अधिवेशनाच्या कर्तव्यावर असणारा सुमारे सहा हजार पोलिसांचा ताफा उपलब्ध झाल्यास पोलिसांवर असणारा ताण कमी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर काल पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सर्व पक्षांचे गटनेते यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत कालच बैठक घेतली होती. 

आज सकाळी फडणवीस यांनी या संदर्भात बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गटनेते उपस्थित होते. या बैठकीत आजच अर्थसंकल्पी अधिवेशन आटोपते घेण्याच्या निर्णयाला सर्वच राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली. या बैठकीनंतर फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करीत अर्थसंकल्पी अधिवेशन आज संपुष्टात येत असल्याची घोषणा केली. 

अधिवेशन आटोपते घेण्याबाबत मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील, शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, शिवसेनेचे गटनेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला. यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अधिवेशन संपल्याचे जाहीर केले अणि राज्यपालांच्या वतीने पुढील अधिवेशनाची तारीख जाहीर केली. 

आव्हाड यांची मागणी 
पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेले वैमानिक वर्धमान अभिनंदन यांना परत आणण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबबत सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, की ज्या ज्या वेळी देशावर संकट येते त्या त्या वेळी आपण राजकारण विसरून सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकलो आहोत. मात्र, आपल्या देशाचा पुत्र वर्धमान अभिनंदन हा पाकिस्तानच्या भूमीत आहे. त्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आपण मागणी करूया. तो ठराव राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना पाठवला जावा. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनानंतर आमदार जयंत पाटील यांनी आव्हाड यांची मागणी उचलून धरली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा ठराव मंजूर केला.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com