मुंबई - मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी कॉंग्रेसला एक प्रस्ताव दिला आहे. मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, पण आम्ही तो नाकारला, असे सांगून शिवसेनेला एकप्रकारे तोंडघशी पाडले. असे असले तरी अजूनही महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी कॉंग्रेसची अप्रत्यक्ष का होईना मदत घेण्याची शिवसेनेची मानसिक तयारी असल्याचेही सांगितले जात आहे.
महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसमधील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे.
निकालानंतरही शिवसेना, भाजपमधील सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने गुप्त बैठका, खलबतांनी मुंबई ढवळून निघाली आहे.
कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा, की त्यांना उपमहापौरपदासारखे पद द्यायचे याविषयी शिवसेनेतील वरिष्ठ वर्तुळात खल चालू असल्याचे समजते. मुंबई महापौरपदाची निवड 9 मार्च रोजी होणार असल्याने येत्या काही दिवसांत राजकीय युती, आघाड्यांच्या या खेळातील गुंतागुंत अजूनच वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेच्या सत्तासोपानाच्या या स्पर्धेत शिवसेना आणि कॉंग्रेसच्या प्रत्येक हालचालीवर भाजप नजर ठेवून आहे. भाजपकडून कॉंग्रेसशी हातमिळवणीची अजिबात शक्यता नसली, तरी इतर सर्व पर्याय भाजपकडून पडताळले जात आहेत.
त्याचबरोबर सत्ता मिळविण्यासाठी जादुई आकड्याची गणिते शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी नाकारली असून, ज्या पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा महापौर होतो, असे सांगितले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी फ्लोअर मॅनेजमेंट महत्त्वाचे असेल आणि यात शिवसेना सहज यशस्वी होईल, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
निरुपम, कामत वगळता इतरांची मूकसंमती?
संजय निरुपम, गुरुदास कामत वगळता जवळ जवळ सर्व नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत मूकसंमती दिल्याची चर्चा आहे. उघडपणे कोणी बोलण्यास तयार नसले, तरी कॉंग्रेसमध्येही हालचाली घडत आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉंग्रेसकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले असून, दुसरे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असे वक्तव्य करून शिवसेनेला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले आहे. उत्तर प्रदेशच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान 8 मार्चला होणार असल्याने कॉंग्रेस 9 मार्चला होणाऱ्या मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला अनुकूल भूमिका घेऊ शकते, असे बोलले जात आहे.
|