
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांबाबत प्रतिक्रिया दिली आहे, ४० लोक गुवाहाटीत मजा करत आहेत, ते जिवंत प्रेत आहेत आणि त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होईल असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. (Shivsena sanjay raut statment on uday samant and rebel mla maharashtra political crisis)
यापूर्वी बोलताना राऊत म्हणाले होते की, 40 आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीमधून येतील. त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही 40 रेडे पाठवले आहेत, या विधानावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राऊत म्हणाले की, गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदार, हे मजा करतायत ते दिसतंय, ते खात-पित आहेत, उड्या मारत आहेत. ती जिवंत प्रेत आहेत, त्यांचा आत्मा मेलेला आहे, त्यांची जिवंत प्रेत मुंबईत येतील, मग त्यांच्या पोस्टमार्टमसाठी विधानसभेत पाठवावे लागेल, मी एवढंच बोललो यात चुकीचं काय आहे, असे राऊत म्हणाले.
सुनिल राऊत शिंदे यांच्या संपर्कात असल्याबद्दल विचारले असत संजय राऊत म्हणाले की, मी आणि माझा परिवार जीव देऊ, संपून जाऊ पण बाळासाहेबांची शिवसेना आमचा श्वास आहे. बोलणारे बोलू देत, जास्तीत जास्त काय होईल सत्ता, खासदारकी जाईल पण शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे संजय राऊत म्हणाले आहेत.
उदय सामंत देखील सुरतमार्गे गुवाहाटीला पोहचले आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे, संजय राऊत म्हणाले की, त्या सुरतमध्ये काय जादूटोणा आहे ते पाहावं लागेल, सुरतमार्गे का? मुंबईहून गुवाहाटीला जाता येतं, सुरताला कोणापुढे गुडघे टेकावे लागतात असा सवाल राऊतांनी केला आहे. मंत्रीपद द्यायचं की नाही हे सुरतला ठरतंय, एवढी गुलामी महाराष्ट्राच्या आमदारांनी करताना मागच्या ६० - ६५ वर्षात पाहिली नाही, या आमदारांना लाज वाटली पाहीजे असे संजय राऊत म्हणाले. शिंदेच्या गटात सहभागी झालेल्या मंत्र्यावर कारवाई होणार असे देखील त्यांनी सांगितले.