कृषीप्रधान महाराष्ट्रातील वास्तव! दररोज ७ विवाहितांचे पुसले जातयं कुंकू; अमरावती, छ. संभाजीनगर विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

सातबाऱ्यावर बॅंकेचा बोजा आणि खासगी सावकारांच्या कर्जाचा बोजा, त्यातच मुलीचा विवाह, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवताना त्याला तारेवरची कसरत करावी लागते. त्यातून राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात, अशी वस्तुस्थिती समोर आली आहे.
sakal exclusive
sakal exclusivesakal

सोलापूर : राज्यातील शेतकरी अतिवृष्टी तर कधी अवकाळी आणि कधी दुष्काळ, अशा संकटांमुळे पिचला आहे. दुसरीकडे शेतमालाला हमीभाव देखील नाही. सातबाऱ्यावर बॅंकेचा बोजा आणि खासगी सावकारांच्या कर्जाचा बोजा, त्यातच मुलीचा विवाह, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवताना त्याला तारेवरची कसरत करावी लागते. त्यातून राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी कुटुंबातील कर्ता आत्महत्या करतोय. त्यातून त्या विवाहिता विधवा होत असून मुले अनाथ होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ‘राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू’ अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र, मागील १ जुलै २०२२ ते ३० ऑक्टोबर २०२३ या काळात राज्यातील तब्बल तीन हजार ७२७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

तर १ डिसेंबर ते ३० जून २०२२ या ३० महिन्यांत सहा हजार ९६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. नैसर्गिक संकटाशी सामना करून जगाचा पोशिंदा कष्ट करतो. मात्र, आपत्ती काळात त्याला सरकारकडून पुरेशा प्रमाणात मदतीचा हात दिला जात नाही. खासगी सावकार दारात येतो तर बॅंकांकडूनही नोटीस येते. अशावेळी बळिराजासमोर मुलीचा विवाह, मुलांच्या शिक्षणाबरोबरच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा, असेही प्रश्न असतात.

संकटाच्या चक्रव्युहात अडकलेला बळीराजा त्यावेळी टोकाचा विचार करतो ही वस्तुस्थिती आहे. मागील चार वर्षांत कोकण विभागात एकही शेतकरी आत्महत्येची नोंद नाही. पण, चिंतेची बाब म्हणजे चार वर्षांत अमरावती व छत्रपती संभाजी नगर विभागात सर्वाधिक आठ हजारांवर आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्यामागील अचूक कारणांचा वेध घेऊन ठोस उपाय काढल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

‘महाविकास’च्या अडीच वर्षांची स्थिती

  • १ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० : २७८९

  • १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२२ : ४,१८०

  • एकूण शेतकरी आत्महत्या : ६,९६९

विद्यमान सरकारच्या १५ महिन्यातील स्थिती

  • १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ : १,४५२

  • १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर : २,२९२

  • एकूण शेतकरी आत्महत्या : ३,७४४

विभागनिहाय शेतकरी आत्महत्या

  • विभाग एकूण आत्महत्या

  • कोकण ०००

  • पुणे ९१

  • नाशिक १,३७५

  • छ. संभाजीनगर ३,६४४

  • अमरावती ४,४३६

  • नागपूर १,२०२

  • एकूण १०,७४८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com