424 जणांनी गमावले प्राण; "शिवशाही'ही असुरक्षित
मुंबई - एसटी गाड्यांच्या अपघातांचा टक्का वाढत आहे. वर्षभरात एसटीच्या तब्बल दोन हजार 932 अपघातांत 424 जणांचा मृत्यू, तर पाच हजार 543 जण जखमी झाले आहेत. त्यातच शिवशाहीच्या अपघातांची भर पडली आहे.
यंदा एप्रिलमध्येच 237 अपघात झाले आहेत. यात 43 जणांना प्राण गमवावे लागले; तर 371 जखमी झाले. यामुळे एसटीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एसटीत चालक-भरती करताना जड वाहतुकीचा परवाना व तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर लेखी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला भोसरी येथे ट्रॅकवर पाच चाचण्या द्याव्या लागतात. तेथे सरासरी 66 टक्केच उमेदवार उत्तीर्ण होतात. त्यांची वैद्यकीय तपासणी करून रुजू करून घेतले जाते. त्यानंतर बसचे 42 दिवसांचे प्रशिक्षण आणि परत एक चाचणी घेऊनच हातात बस दिली जाते. त्यातही पहिल्या दोन हजार किलोमीटरची ड्यूटी ही 100 किलोमीटरच्या आतील मार्गावरच असते. तरीही एसटीचे वाढत्या अपघातांचे शुक्लकाष्ठ सुटायला तयार नाही.
खासगी चालकांमुळे एसटीची शिवशाही सेवा असुरक्षित बनली आहे. तीन महिन्यांत दोन हजार 18 शिवशाही बसचे नऊ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये तीन ठार, तर 129 जखमी झाले आहेत. शिवशाहीच्या चालकांना केवळ 10 दिवसांचे ट्रेनिंग देऊन गाडी मार्गस्थ केली जाते.
वर्ष - एकूण अपघात - मत्यू - जखमी
2014-15 - 3172 - 494 - 6276
2015-16 - 2920 - 445 - 5213
2016-17- 2772 - 445 - 4745
2017-18 - 2932- 424- 5543
एप्रिल 18 - 237- 43- 371
|