लय भारी! राज्याच्या भूजलपातळीत झाली वाढ

State-Water-Level
State-Water-Level

पुणे - पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडल्याने भूगर्भातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे पाणीटंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील ७६ तालुक्यांतील सुमारे ९८२ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक वाढली असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी अवघ्या १४५ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती भासणार असल्याचे चित्र आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे या भागांतील धरणे भरली होती. मात्र विदर्भातील पश्‍चिम भागात अत्यंत कमी, पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणेही कमीअधिक स्वरूपात भरली आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचा परिणाम भूजलपातळीच्या स्थितीवर होऊ लागला आहे. गेल्या वर्षी सुमारे ९ हजार ३५५ गावांमध्ये एक मीटरपेक्षा पाणीपातळी खोल गेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी वाढ झाली असली, तरी उपसा अधिक झाल्यास उन्हाळ्यात काही प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्जन्यमानाचा तुलनात्मक अभ्यास 
ऑक्टोबरअखेरीस तालुकानिहाय पर्जन्यमानासोबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या तुलनेत ३५५ तालुक्यांपैकी २५८ तालुक्यांत सरासरी, त्यापेक्षा जास्त पर्जन्यमान झालेले असून, ६७ तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आली आहे. सरासरीच्या पर्जन्यामानाच्या तुलनेत तूट आलेल्या २५८ तालुक्यांपैकी ६७ तालुक्यांत ० ते २० टक्के तूट आढळून आली आहे.

अधिक उपशामुळे मराठवाड्यात घट
मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने भूजलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत चांगलीच घट झाली आहे. मात्र उपसा अधिक होत असल्याने मराठवाड्यातील १५ तालुक्यांतील ९० गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल असल्याचे निदर्शनास आले आहे.

यात जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांतील गावांचा समावेश आहे. त्यापैकी ५४ गावांत एक ते दोन मीटर, तर २५ गावांत दोन ते तीन मीटर, तर ११ गावांत तीन मीटरहून अधिक खोल पाणीपातळी गेली आहे.

यंदा चांगल्या पावसामुळे भूजलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र रब्बी हंगामात पाण्याचा उपसा अधिक वाढला, तर पुन्हा पाणीपातळी झपाट्याने खाली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून कमीत कमी उपसा कसा करता येईल, यावर भर द्यावा.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com