जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल राममंदिर

Rammandir
Rammandir

‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने होणार असलेल्या राममंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी झाला. नऊ नोव्हेंबर २०१९ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारने ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी पाच ऑगस्ट २०२०रोजी श्री रामजन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्री गणेशा केला. 

प्रस्तावित निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फुटांची असेल. मंदिराची एकूण उंची १६१फूट असेल, लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट असेल. त्यावर पाच शिखरे असतील. तीन मजल्यांमध्ये मिळून एकूण १६० स्तंभ लागतील. हे मंदिर २.७ एकर जागेवर होईल. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांनी असेल. सिमेंट व लोखंडाचा वापर यात होणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंदिर परकोटाच्याबाहेर सुमारे १०८ एकर जागेवर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा होतील. मंदिर बांधकामाचे वास्तुकार मे. चंद्रकांतमाई सोमपुरा, बांधकाम कर्ता, मे. लार्सन अँड टूब्रो; तसेच व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. टाटा कंसल्टिंग इंजिनियर्स यांना निश्‍चित करण्यात आले आहे. एकूण तीन ते साडे तीन वर्षांच्या अवधीत हे कार्य पूर्ण होईल. पायाभरणीसाठीसुद्धा तज्ज्ञ समितीच्या मार्गदर्शनानुसार दगडांचा वापर होईल.

मंदिराच्या बांधकामाच्या अनुषंगाने श्री अयोध्यानगरीचे विकास कार्यसुद्धा सुरू झाले आहे. बांधकामानंतर आधी संपूर्ण भारत देश, नंतर जवळपासचे आशियाई देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेच्या केंद्राच्या रूपात ती पुढे येऊन जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे स्वरूप तिला येईल, असा आमचा प्रयत्न राहील. या कार्यासाठी अर्थसंकलन करण्यासाठी मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत म्हणजे १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१पर्यंत ‘निधी समर्पण अभियाना’चा आरंभ होत आहे. या माध्यमातून चार लाख गावे तसेच ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे. निधीची रीतसर पावती देण्यात येईल. तसेच १०००/-, १००/- आणि १०/- रुपयांच्या कुपनच्या  माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक जाती, संप्रदाय, मत, पंथ, क्षेत्र, भाषा, प्रदेशातील भाविकांशी संपर्क होईल. अरुणाचल, नागभूमी (नागालॅंड) अंदमान-निकोबासोबतच कच्छ रण, पर्वतीय क्षेत्र आणि वनांचलातील सुदूर व्यक्तींशीसुद्धा संपर्क होईल. काश्‍मीर ते कन्याकुमारी तसेच सोमनाथ ते मेघालयापर्यंत सर्व प्रकारच्या श्रद्धांच्या सेतुबंधनांनी  राममंदिर उभे राहील.

सर्व गावांत अभियान
निधी समर्पण अभियानात महाराष्ट्रात ४५ हजार गावांतील अडीच कोटी कुटुंबांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात पाच हजार संत आणि २.५ लाख रामभक्त कार्यकर्ते पूर्णवेळ अभियानाचे लक्ष्य गाठण्यासाठी कार्यरत असतील. महाराष्ट्रातील सर्व गावे व कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.  पंथ, प्रांत, भाषा, पक्ष याप्रकारचे सर्व भेद विसरून सर्व रामभक्त एकदिलाने रामकार्यात सक्रिय झाले आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या सात जिल्ह्यांत एकूण १० हजार गावांतील ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट आहे. यात दोन हजार संत आणि ५० हजार रामभक्त कार्यकर्ते पूर्णवेळ अभियान करणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील आदिवासी भागातही हे अभियान सर्व गावांत होणार आहे. तसेच पुणे शहरात आठ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याकरिता आठ हजार कार्यकर्ते कार्यरत असतील. पश्‍चिम महाराष्ट्र प्रांतात १५ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत हे अभियान होणार आहे.  हे केवळ मंदिराचे बांधकाम नाही, अजेय राष्ट्रमंदिराच्या उभारणीचे कार्य आहे. हजारो हुतात्म्यांनी या धर्मकार्यात बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागाचे श्रद्धापूर्वक स्मरण करून समाजातील सर्वांनी अधिकाधिक अर्थदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे! 
(लेखक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोशाध्यक्ष आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com