मुंबई - प्रियांका वद्रा राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्या उत्तर प्रदेशातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रियांका उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तरी, त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याच्या शक्यतेने भाजप नेत्यांना धास्ती वाटत असल्याची चर्चा मंत्रालयात सुरू झाली आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांकांची कॉंग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केल्यानंतर आता प्रियांका गांधी कोणत्या लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार याबाबत चर्चा होऊ लागली आहे. प्रियांका गांधी या सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. रायबरेली हा कॉंग्रेसचा गड आहे. सक्रिय राजकारणात येण्याआधी प्रियांका रायबरेली आणि अमेठीमधील स्थानिक राजकारणात आणि प्रचारांत सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी प्रियांका रायबरेली आणि अमेठीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रचार करताना पाहायला मिळत होत्या. या दोन मतदारसंघांत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षातर्फे उमेदवार उभा केला जाणार नाही. असे दोन्ही पक्षांनी अगोदरच जाहीर केले आहे. अमेठी हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. त्यामुळे प्रियांका रायबरेलीमधून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच "प्रियांका लोकसभा निवडणूक लढणार की नाही, हे ती स्वतः ठरवेल,' असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
पोस्टरबाजी सुरू
चार फेब्रुवारीपासून प्रियांका पूर्व उत्तर प्रदेशचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी राजधानी नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु हा कार्यक्रम आता लखनौ येथे होणार असल्याची माहिती आहे. कॉंग्रेसतर्फे उत्तर प्रदेशात सर्वत्र प्रियांका गांधींचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वत्र त्यांची दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी तुलना केली जात आहे. प्रियांका वद्रा यांच्याबद्दल राष्ट्रीय राजकारणात चर्चा असताना त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. प्रियांका उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात उतरल्या तरी, त्या वातावरणाचा प्रभाव देशासह महाराष्ट्रातही असणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये याच मुद्द्यावर चर्चा सुरू असल्याचे मंत्रालयात कामानिमित्त येणारे आमदार-खासदार बोलत आहेत.
|