उताऱ्यातही वाढ; 79 कारखान्यांचा हंगाम संपला
माळीनगर - दुष्काळी स्थितीतही यंदाच्या हंगामात 15 मार्चअखेर राज्यात 100 लाख टनांपेक्षा अधिक साखर उत्पादन झाले आहे. दुष्काळ, उसाला हुमणीचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रादुर्भाव अशी पार्श्वभूमी असतानादेखील गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन व सरासरी साखर उताऱ्यात झालेली वाढ आश्चर्यकारक आहे. चालू गळीत हंगामात राज्यात सुरू झालेल्या 195 पैकी 79 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.
राज्यात 15 मार्चअखेर 896.66 लाख टन उसाचे गाळप होऊन सरासरी 11.15 टक्के साखर उताऱ्याने 100.09 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदाच्या तुलनेत मागील हंगामात याच कालावधीत 840.99 लाख टन ऊस गाळप होऊन 11.06 टक्के साखर उतारा मिळून 93.20 लाख टन साखर तयार झाली होती. साखर उत्पादन व सरासरी साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका सोलापूर विभागाला बसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुष्काळामुळे सोलापूर विभागाचा सरासरी साखर उतारा घटला असून, तो साडेदहा टक्क्यांपेक्षा कमी आहे.
राज्यातील यंदाचा साखर हंगाम मार्चअखेरीस संपण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक 20 लाख 36 हजार 720 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. याच विभागातील गुरुदत्त कारखाना 13.25 टक्के सरासरी साखर उतारा मिळवून राज्यात आघाडीवर आहे.
15 मार्चअखेर गाळपाची स्थिती
विभाग- ऊस गाळप - साखर उत्पादन - साखर उतारा
(लाख टन) (लाख क्विंटल) (टक्के)
कोल्हापूर 206.90 254.28 12.29
पुणे 189.30 217.24 11.48
सोलापूर 200.18 204.56 10.22
नगर 135.54 148.72 10.97
औरंगाबाद 82.38 85.56 10.39
नांदेड 73.51 81.55 11.09
अमरावती 3.26 3.36 10.30
नागपूर 5.59 5.58 9.98
|