महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा तडाखा

Heatstroke
Heatstroke

ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान
पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले; तर पुण्यात पाच वर्षांमधील मे महिन्यातील उच्चांकी म्हणजे ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

दरम्यान, राज्यात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या ६५ दिवसांमध्ये उष्माघाताच्या ४१८ रुग्णांची नोंद झाली. त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

हवामान खात्याने आज राज्यातील प्रमुख २५ शहरांमधील कमाल तापमान नोंदविले. त्यापैकी १९ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. 

राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उष्ण हवामान आहे. काही भाग आकाश अंशत: ढगाळ होत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्याने लोक त्रस्त झाले आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, ब्रह्मपुरी येथे उष्णतेची लाट पसरली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ही उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्‍यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात हलक्‍या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुण्यातील उच्चांकी तापमान
पुण्यात दोन दिवसांपासून सलग ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होत आहे. मात्र, सोमवारी कमाल तापमानाने चाळिशी ओलांडत गेल्या सहा वर्षांपूर्वीच्या मे महिन्यातील कमाल तापमानाशी बरोबरी केली. एक मे २०१३ मध्ये ४१.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा एकदा तितकेच तापमान नोंदले गेले. पुण्यात दहा वर्षांमधील उच्चांक १९ मे २०१० मध्ये ४१.९ अंश सेल्सिअस होते, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
शहरात येत्या शुक्रवारपर्यंत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदले जाण्याची शक्‍यता असल्याने शहर आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. पुण्यात सलग चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर शक्‍यतो पडू नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

उष्माघात हा एक ‘सायलेंट डिझास्टर’ आहे. यंदा राज्यात उष्णतेची लाट मोठी आहेच; पण ती बराच काळ टिकलेली आहे. राज्यभरात ‘हिट ॲक्‍शन प्लॅन’ तयार असल्याने आपण या संकटाशी चांगल्या प्रकारे तोंड देत आहोत. प्रत्येक महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार काम सुरू आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com