सोलापूर - राज्यातील शिक्षक भरतीवर अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असताना 23 जानेवारी 2017 च्या परिपत्रकानुसार उपशिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदस्थापना; तर 2014 च्या "ग्रामविकास'च्या अधिसूचनेनुसार सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी, असे निकष असतानाही तेरा जिल्हा परिषदांनी त्याचे उल्लंघन केले आहे. त्यामध्ये ठाणे, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, वर्धा, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, परभणी, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. सहावी ते आठवीच्या वर्गातील गणित व विज्ञान विषयात पदवी अपूर्ण असलेल्या उमेदवारांना पदोन्नती दिल्याचा आरोप "डीटीएडबी एड स्टुडंटस्' असोसिएशनने केला आहे.
मागील आठ वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती करण्याच्या उद्देशाने सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांकडून पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा दोन पद्धतींत माहिती मागविली. त्यानुसार तेरा जिल्ह्यांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गातील एकही पद रिक्त नसल्याची माहिती देण्यात आली. रिक्तपदांच्या 30 टक्के जागा पदोन्नतीने भरणे बंधनकारक असतानाही स्वतंत्र रोस्टर तयार करण्याचा त्रास कमी व्हावा आणि मर्जीतल्या शिक्षकांना पदोन्नती मिळावी, या उद्देशाने हा प्रकार संबंधित जिल्हा परिषदांनी केल्याचा आरोप "स्टुडंटस् असोसिएशन'चे राज्याचे सरचिटणीस संदेश देवकते यांनी केला.
विभागनिहाय शिक्षकांची रिक्तपदे
कोकण - 2,955
पुणे - 2,816
नाशिक - 1,551
औरंगाबाद - 1,605
अमरावती - 898
नागपूर - 536
23 फेब्रुवारीपासून भरतीला प्रारंभ
राज्यातील 27 शाळा व 253 खासगी संस्थांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षकांची सहा हजार 398; तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांची तीन हजार 963 पदे रिक्त आहेत. 23 फेब्रुवारीला शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
पदवीधर व उपशिक्षकांची बिंदुनामावलीप्रमाणे एकत्रित माहिती शासनाला पाठविली आहे. सोलापूर जिल्ह्यात समाजशास्त्रातून पदवी झालेले सर्वाधिक शिक्षक असून, विज्ञान विषय शिक्षकांची पदे रिक्त आहेत. माहिती भरताना त्रुटी राहिल्या असतील, तर त्या शासनाच्या आदेशाप्रमाणे पूर्ण केल्या जातील.
- संजय राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
|