मराठा आरक्षणाच्या सर्व्हेची प्रमुख जबाबदारी शिक्षकांवरच; आधी सर्व्हे मग शाळा, तहसीलदारांचे निर्देश; अंगणवाडी सेविकांना वगळले

गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी २३ ते ३१ जानेवारी दरम्यान घरोघरी सर्व्हे केला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने त्यांना वगळून सर्व्हेची जबाबदारी जिल्हा परिषदेसह माध्यमिक शिक्षक, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवकांवर सोपविली आहे.
mantralay
mantralaysakal

सोलापूर : आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने २३ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्य सरकारतर्फे घरोघरी जाऊन सर्व्हे केला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने त्यांना वगळून सर्व्हेची जबाबदारी जिल्हा परिषदेसह माध्यमिक शिक्षक, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवकांवर सोपविली आहे. आधी सर्व्हे मगच शाळा, असे निर्देश तहसीलदारांनी शिक्षकांना दिले आहेत.

मराठा समाजाच्या अनुषंगाने राज्य सरकारने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली असून मराठ्यांचे आरक्षण टिकावे, यासाठी न्यायमूर्ती गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटींची पूर्तता सर्व्हेच्या माध्यमातून केला जात आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.

दरम्यान, राज्यात आढळलेल्या ५४ लाख मराठ्यांना कुणबीचे जात प्रमाणपत्र द्यावे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यांनी असंख्य मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शिक्षकांना प्रत्येकी १०० घरांच्या सर्व्हेची जबाबदारी दिली आहे. नऊ दिवसांत हा सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे. त्याचे प्रशिक्षण आता संपले असून मंगळवारी (ता. २३) हा सर्व्हे सुरू होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात त्यासाठी साडेसहा हजार सर्व्हेक्षक व साडेचारशे पर्यवेक्षक नेमले आहेत. त्यात नऊशेजण राखीव आहेत.

कुटुंबातील कर्ता मुंबईला, तरी सर्व्हे होणार

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानाकडे निघाले आहेत. २६ जानेवारीला ते त्याठिकाणी पोचणार आहेत. त्याच दरम्यान गावोगावी मराठा आरक्षणाचा सर्व्हे सुरू होणार आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबातील लोक सर्व्हेची माहिती देणार आहेत. शेवटी सर्व्हेत दिलेल्या माहितीची पडताळणी होणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचा सर्व्हे नाही

मराठा आरक्षणाच्या सर्व्हेत १५४ प्रश्न असून सुरवातीला प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आरक्षणाचा लाभ घेता का, असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ‘हो’ असे दिल्यास पुढील सर्व्हे आपोआप पूर्ण होणार आहे. ॲपद्वारे आरक्षणाचा लाभ न घेणाऱ्या कुटुंबाचीच माहिती घेतली जाणार आहे. केवळ मराठा समाजाचीच नव्हे तर गावातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे यावेळी होणार आहे. कृषी सहायक व गटविकास अधिकाऱ्यांवर सर्व्हेचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. काही शिक्षकांनी दहावी- बारावीच्या पूर्व व प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक आणि प्रजासत्ताक दिनाचे कारण पुढे केले आहे. पण, राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्वांनाच वेळेत हा सर्व्हे पूर्ण करावाच लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com