उजनी धरणातील पाणी आता फक्त पिण्यासाठीच! धरण उणे १४ टक्के; आता शेतीसाठी कॅनॉलमधून पाणी सोडणे अशक्यच

उजनी धरण फेब्रुवारीतच झपाट्याने तळ गाठत असून सध्या धरणातील साठा मायनस १४ टक्क्यांपर्यंत आहे. शनिवारी धरणातून सोडलेले पाणी बंद केले जाणार असून मायनस १५ टक्क्यानंतर कॅनॉलमधून पाणी सोडणे आपोआप बंद होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.
सोलापूर : उजनी धरण
सोलापूर : उजनी धरणsakal

सोलापूर : उजनी धरण फेब्रुवारीतच झपाट्याने तळ गाठत असून सध्या धरणातील पाणीसाठा मायनस १४ टक्क्यांपर्यंत आहे. उद्या (शनिवारी) धरणातून कालव्यातून सोडलेले पाणी बंद केले जाणार असून मायनस १५ टक्क्यानंतर कॅनॉलमधून पाणी सोडणे आपोआप बंद होते. त्यामुळे तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.

उजनी धरणातून कालव्यात जानेवारीत सोडलेले पाणी आता १७ फेब्रुवारीला बंद केले जाणार आहे. आष्टी तलावात आवर्जून पाणी सोडण्यात आले असून सध्या हा तलाव ५२ टक्क्यांपर्यंत भरला आहे. या तलावावर ५१ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असून आता तलावात पाणी सोडल्याने उन्हाळ्यापर्यंत त्या गावांची चिंता मिटली आहे. धरण मायनस १५ टक्के झाल्यावर कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे आता पावसाळ्यापर्यंत शेतीला पाणी सोडले जाणार नाही, हे निश्चित आहे.

उन्हाळ्यात धरणातून १३ टीएमसी पाणी बाष्पीभवनातून जाते. त्यामुळे एकूण ५६ टीएमसी मृतसाठ्यात १८ टीएमसीपर्यंत गाळ आणि बाष्पीभवनातून जाणारे पाणी, यातून केवळ २८ टीएमसीच पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड, बारामतीसह सर्व पाणीपुरवठा योजनांची तहान संपूर्ण उन्हाळा कालावधीत भागवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर बॉक वॉटरवरील पाणी उपसा देखील बंद केला जाण्याची शक्यता आहे.

चार महिन्यांत संपले ४० टीएमसी पाणी

१७ ऑक्टोबर २०२३ रोजी उजनीतील जिवंत पाणीसाठा ३२.३५ टीएमसी (मृत साठ्यासह एकूण ९६ टीएमसी) होता. पाऊस कमी झाल्याने धरण केवळ ६३ टक्केच भरले होते. पण, पावसाळा संपल्यावर वेळोवेळी पाणी सोडण्यात आले. भविष्यातील उन्हाळ्याचे संकट तीव्र असतानाही अवघ्या चार महिन्यांत धरणातील ४० टीएमसी पाणी संपले. आता धरणात मृतसाठा ५६ टीएमसी असून त्यातही १८ टक्क्यांपर्यंत आणि बाष्पीभवनाचा पाणी वगळून उर्वरित साठा आगामी पावसाळ्यापर्यंत पुरवावा लागणार आहे.

सोलापूर शहरासाठी नदीतून दोन आवर्तने

सोलापूर शहराला प्रत्येक ५५ ते ६० दिवसांनी उजनी धरणातून पाणी सोडावे लागते. भीमा नदीतून औज बंधाऱ्यापर्यंत तब्बल १६० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दहा दिवस लागतात. त्यामुळे दोन टीएमसी क्षमतेच्या औज बंधाऱ्यात पाणी पोचण्यासाठी प्रत्येकवेळी सहा ते सात टीएमसी पाणी सोडावे लागते. आता उन्हाळ्यात मार्च व मे महिन्यात उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून दोनदा पाणी सोडले जाणार आहे.

धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन

उजनी धरणातील कॅनॉलमधून सोडलेले पाणी उद्या (शनिवारी) बंद होईल. धरणातील पाणी यापुढे पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठीच वापरले जाणार आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार नाही, यादृष्टीने धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com