जिजाऊंच्या आयुष्यात अंधश्रद्धेला बिलकुल थारा नव्हता...

जिजाऊंच्या जीवनात जसजसे आपण डोकावतो आणि एकरूप होतो तसतसे त्या आपल्याला अधिकच महान उंचीच्या भासायला लागतात.
Jijau Death Anniversary
Jijau Death Anniversary
Summary

जिजाऊंच्या जीवनात जसजसे आपण डोकावतो आणि एकरूप होतो तसतसे त्या आपल्याला अधिकच महान उंचीच्या भासायला लागतात.

इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्रियांनी आपली ठसठशीत मुद्रा उमटवली त्यात अग्रक्रमाने घ्यावे असे नाव म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. जिजाऊंच्या जीवनात जसजसे आपण डोकावतो आणि एकरूप होतो तसतसे त्या आपल्याला अधिकच महान उंचीच्या भासायला लागतात. आपल्या कर्तृत्वाने आणि धैर्यशील स्वभावाने महाभयंकर संकटालाही नमवता येतं हे शिकावं केवळ जिजाऊंच्या चरित्रातून. आज जिजाऊंचा स्मृतीदिन. (Jijau Death Anniversary)

६ जून १६७४ ला झालेल्या शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बरोबर बाराव्या दिवशी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाऊ अनंतात विलीन झाल्या. रयतेसाठी त्यांनी आपला शिवबा या मातीला दिला होता. असा शिवबा, ज्याचं अस्तित्व कितीही वर्षे निघून गेली तरी काळाच्या ओघात मिटणारे नव्हते. यासाठी जिजाऊंना खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी जिजाऊंनी जो संघर्ष केला त्याला इतिहासात तोड नाही. जिजाऊंना माहेराहून सुद्धा संपन्न वारसा लाभला होता.

Jijau Death Anniversary
मोदी सरकारला लोकशाही नाही तर हुकूमशाही हवीय, कॉंग्रसेचा हल्लाबोल

जाधवांच्या प्रसिद्ध कुळातील मातब्बर सरदार लखुजीराव जाधव आणि अतिशय करारी व्यक्तिमत्त्वाच्या म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊ जन्मल्या. १२ जानेवारी १५९८ रोजी पौष पौर्णिमेला सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. तेव्हा लखुजीरावांनी हत्तीवरून साखर वाटली होती आणि मुख्य म्हणजे मुलगा-मुलगी असा भेद न करता जिजाऊंना तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे, घोडेस्वारीचे शिक्षण दिलं होतं. लखुजीरावांनी ज्या पद्धतीने जिजाऊंना घडवले ती पद्धत, ते संस्कार प्रत्येक वडिलांनी मुलीवर करण्याची गरज आहे.

निर्माणक्षम जिजाऊ ज्यावेळी लहानशा शिवबाला घेऊन पुण्याला आल्या तेव्हा मुरार जगदेवाने पुणे जहांगिरीवर गाढवाचा नांगर फिरवला होता आणि ही भूमी जो कुणी कसेल त्याचा निर्वंश होईल अशी अफवा पसरवून टाकली. अशा अफवांना भीक घालणाऱ्या जिजाऊ नव्हत्याच मुळी. त्यांनी बुद्धी वापरली आणि रयतेलाच प्रश्न विचारले, 'भूमी कधी शाप देते का? ती तर आपली काळी आई. तिची सेवा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. घाबरू नका, मी माझ्या शिवबाच्या हातून त्यावर नांगर फिरवते आहे आणि जमीन कसण्याचा शुभारंभ करते आहे. काहीही विपरीत होणार नाही. विश्वास ठेवा.'

अशा तऱ्हेने घालून दिलेल्या भीतीला भीक न घालण्याचे मोठे कार्य जिजाऊंनी त्याकाळी केले. त्यामुळेच या घटनेची नोंद इतिहासात मुरार जगदेवने लोखंडी पहार ठोकून गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्यात जिजाबाईंनी सोन्याचा नांगर फिरवला अशी आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जिजाऊंचे चरित्र मांडताना केवळ महान माता म्हणून त्यांची थोरवी वर्णन करणे म्हणजे केवळ एकाच पैलूचे रेखाटन करणे होय. जिजाऊ अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या धनी आहेत. त्यांचं हे व्यक्तिमत्त्व पुन्हा अभ्यासण्याची आणि त्यांच्या कार्याचा पुन्हा शोध घेण्याची गरज आहे. कवी परमानंदाने' शिवभारत'मध्ये जिजाबाईंचे फार सुंदर वर्णन केले आहे.

Jijau Death Anniversary
Weather Update : देशातील अनेक राज्यांत मान्सूनपूर्व पावसाची बरसात

'जिजू: जागर्ति जगतीतले!' अशी उपाधी देऊन मालोजीराजे यांचे पुत्र शहाजी राजे यांची पत्नी असलेली महासाध्वी, विजयवर्धिनी जिजू (जिजाऊ) ही पृथ्वीतलावर जागृत आहे! अशा शब्दात त्यांनी गौरव केला आहे. शिवरायांच्या वेळी जिजाऊंना लागलेल्या डोहाळ्याचे वर्णन परमानंदाने फार सुंदर केले आहे. ते म्हणतात - पर्वतावर चढून जावे, हत्तींच्या पाठीवर बसावे, वाघांच्या पाठीवर बसावे, सोन्याच्या सिंहासनावर स्थीरपणाने आसीन व्हावे, डोक्यावर शुभ्र छत्र धरले जावे, युद्धकर्मे करावी, शक्ती नावाचे शस्त्र, खड्ग, चिलखत ही युद्धसाधने धारण करावीत, किल्ले जिंकून घ्यावेत, मोठमोठी दाने देण्यात आनंद मानावा असे डोहाळे जिजाऊंना लागले होते.

जिजाऊंचे हे डोहाळे पुढील क्रांतीची जणू नांदी होती. ही केवळ कविकल्पना नव्हती हे सिद्ध करणारा अत्यंत महत्त्वाचा पुरावा शिवराय अडीच महिने पन्हाळ्याच्या किल्ल्यात अडकून पडले असता जिजाऊंनी जे पाऊल उचलले आणि जी भाषा उच्चारली ती या कृतीत दिसून येते.

जिजाऊंनी अंधश्रद्धेला कसा विरोध केला?

जिजाऊंनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कुठल्याही वाईट प्रथा आणि अंधश्रद्धांना कधीच थारा दिलेला नव्हता. तेव्हा पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जावे अशी प्रथा होती. त्या काळी सती जाणं हे प्रतिष्ठेचं मानलं जाई. पण शहाजीराजांच्या निधनानंतर जिजाऊ यांनी सती न जाता आपल्या मुलाचा आधार बनून त्याला भक्कम अशी साथ दिली.

पुढे मग त्यांच्या आई म्हाळसाबाई आणि सासूबाई उमाबाई या सुद्धा सती गेल्या नव्हत्या. सती प्रथा बंद करणाऱ्या या महान स्त्रिया आहेत. रूढी-परंपरांना धुडकावून लावण्याची ताकद आजही फार कमी स्त्रियांमध्ये आहे. सोयराबाईंचा राजाराम पालथा जन्माला आला होता. पालथं मूल जन्माला आलं तर त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे कोणतेही नैसर्गिक संकट येऊ नये म्हणून धार्मिक कर्मकांड केली जात. पण ' जन्माला आलेलं बाळ ते निष्पाप असतं. कुठलेही धार्मिक विधी करायचे नाहीत. तो निजामशाही पालथी घालेल असे का समजू नये?‘ असे त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. असं म्हणतात की अंधश्रद्धा स्त्रीच्या पायांनी घरात येतात आणि तिच्या बुद्धीने जिवंत असतात. म्हणून अंधश्रद्धा नष्ट करण्याचं काम फक्त स्त्री आणि स्त्रीच मोठ्या प्रमाणात करू शकते.

Jijau Death Anniversary
आनंदाची बातमी! खाद्यतेल झालं स्वस्त; दरात मोठी घसरण

त्याकाळी जिजाऊ त्यांच्या विचारांतून व कृतीतून पावलोपावली अंधश्रद्धांना हादरे देत होत्या. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून होत्या. स्त्री सन्मान शिकवणाऱ्या जिजाऊ या स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या एक संवेदनशील स्त्री होत्या. आपल्या आया-बहिणींची यवनांकडून लुटली जाणारी अब्रू त्यांना पाहवली नाही. त्यांच्या किंकाळ्या त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यासाठीच त्यांनी स्वराज्याचे बीज शिवरायांच्या मनात पेरले. स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्या आप्तस्वकीयांना सुद्धा अशी शिक्षा केली की जी बघून कोणी तसे करण्यास धजावणार नाहीत.

गरीब शेतकऱ्याच्या तरुण मुलीला उचलून नेणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात कलम करणे असो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाची वागणूक देणे असो किंवा रात्रीच्या वेळी तान्ह्या लेकराच्या ओढीने खडतर बुरूज उतरून लेकराला कवटाळणाऱ्या हिरकणीचा साडीचोळी देऊन सन्मान करणे असो आणि त्या बुरूजाला हिरकणी बुरूज असे नाव देणे असो या सर्वांची बीजं जिजाऊंच्या संस्कारात आढळतात, जिजाऊंच्या सुजाण पालकत्वात दिसतात.

लढाया केल्या अंधार्‍या राती।

पाहिली नाही पंचांग पोथी।

ऐसी होती शिवनीती।

जिजाऊपुत्राची।

शिवरा नव्हता दैववादी।

अमावस्येला मारिले गारदी।

भूत-भविष्य पाहिले ना कधी।

लढाईवर जाताना।

Jijau Death Anniversary
चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही, कारण...

जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्काराचा खजिना. निरंतर टिकणारी मानवी मूल्यांची शिकवण. एक परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्व. जिजाऊंनी शिवबांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून मूल्य शिक्षणाचे धडे दिले ते नुसतं कथनातून नव्हे तर स्वत:च वर्तनातून उभे केले. जिजाऊंचे स्मरण व अनुकरण करण्याच्या मानसिकतेच सुजाण आजच्या 21 व्या शतकातील मातांना हवं. जिजाऊंचे कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व तेही विवेकी असणार्‍या स्त्रियांच्या प्रतीक्षेत समाज आहे. आजही समाज शिवबाच्या प्रतीक्षेत आहे, पण तत्पूर्वी जिजाऊंसारखी कणखर, विवेकी माता असणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com