तिकीट वेटिंग आता बंद! वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून २० डब्यांची; सोलापूर-मुंबईचे ‘असे’ आहे वेळापत्रक; साडेसहा तासांत रेल्वे पार करते ४५५ किलोमीटर अंतर
सोलापूर : सोलापूर, कुर्डुवाडी, पुणे आणि मुंबई मार्गावर धावणारी लोकप्रिय वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून २० डब्यांची होत आहे. गुरुवारी मुंबईहून निघणारी व शुक्रवारी सोलापूरहून सुटणाऱ्या गाडीला नेहमीपेक्षा चार डबे जादा असणार आहेत. विशेष म्हणजे विस्तारित गाडीचे पहिल्या दिवसांचे बुकिंग फुल आहे.
वंदे भारत या गाडीच्या जादा तिकीट दरामुळे सुरवातीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. मात्र, गाडीतील सुविधा व प्रवाशांचा वाचणारा वेळ यामुळे अधिकाधिक प्रवासी या गाडीला पसंती देत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाने २८ ऑगस्टपासून ही गाडी २० डब्यांची करण्याचा निर्णय घेतला. याप्रमाणे गुरुवारी मुंबईहून २० डब्यांची गाडी सुटणार आहे. शुक्रवारपासून सोलापूरहून २० डब्यांची गाडी धावणार आहे. यामुळे पुणे, कल्याण, ठाणे आणि मुंबई परिसरातील प्रवाशांना प्रचंड दिलासा मिळणार आहे. विशेषत: येणाऱ्या दिवाळी, दसरा या सणासुदीच्या हंगामात ‘वंदे भारत’ मध्ये आरक्षण मिळविणे अधिक सुलभ होणार आहे.
अशी आहे गाडीची रचना
या रेल्वे गाडीच्या वेळेत बदल नसून, पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणेच ती धावणार आहे. कालपर्यंत ‘वंदे भारत’ला १६ डबे होते. त्यामध्ये १४ चेअर कार आणि २ एक्झिक्युटिव्ह चेअर कार होत्या. आता २० डबे झाल्यावर यात १७ चेअर कार ३ एक्झिक्युटिव्ह चेअर कार होतील. सध्या तिकीट मिळविण्यासाठी क्षमतेत सुमारे २८६ नव्या जागांची भर पडणार आहे. सध्या एका फेरीत १ हजार १२८ प्रवासी प्रवास करतात. डब्यातील बदलामुळे आता १ हजार ४१४ प्रवासी बसू शकतील.
मुंबईला जाण्यासाठी आता वेटिंग नसेल
सोलापूर-मुंबई वंदे भारत व नांदेड-मुंबई वंदे भारत रेल्वे गाड्यांचे डबे संलग्न केले जाणार असून, दोन्ही गाड्यांमधे डब्यांची संख्या २० होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही गाड्यांच्या हजारो अतिरिक्त प्रवाशांना पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी वेटिंगमुक्त अतिजलद प्रवासाची सोय होणार आहे.
- संजय पाटील, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ
'वंदे भारत'बद्दल थोडक्यात....
सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही सोलापूर-मुंबईला जोडणारी एक हाय-स्पीड ट्रेन आहे. सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी गाडी क्रमांक २२२२६ ही गाडी ११ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू आहे. ही गाडी सोलापूरहून गुरुवार वगळता दररोज सकाळी ६:०५ वाजता निघते आणि दुपारी १२:३५ वाजता मुंबईत पोचते. सुमारे साडेसहा तासांत अंदाजे ४५५ किमी अंतर कापते. आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावते. बुधवार वगळता मुंबईहून सायंकाळी ४.०५ वाजता सुटता ही गाडी आजपासून २० डब्यांची होणार आहे. या गाडीला कुर्डुवाडी, पुणे, कल्याण, दादर असे थांबे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.