वृक्ष लागवडीची चौकशी होणार

tree-planting
tree-planting

मुंबई - फडणवीस सरकारच्या कालावधीत वन विभागाने केलेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा मनोदय महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला असतानाच ही चौकशी होऊनच जाऊ द्या, असे आव्हान माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. आता या वादात अभिनेते सयाजी शिंदे यांनीही उडी घेतल्याने वृक्ष लागवडीचा वाद पेटू शकतो.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस सरकारच्या काळातील पन्नास कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील सरकारच्या काळात कोणी किती झाडे लावली, त्यापैकी किती झाडे जगली, याची सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. चित्रपट अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वर्षभरापूर्वी वृक्ष लागवडीच्या चौकशीची  मागणी केली होती; त्या मागणीनंतर प्रचंड खळबळ उडाली होती.

वृक्षाच्छादन तसेच रोजगार, उत्पन्नवृद्धीसाठी फडणवीस सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. फडणवीस सरकारच्या काळात पन्नास कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यासाठी अभियानावर दरवर्षी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, यातून अपेक्षित काम झाले नसल्याची शंका महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी व्यक्त केली. याची दखल घेत वनमंत्री राठोड यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना पाच वर्षांतील वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

वृक्ष लागवडीची श्वेतपत्रिकाच काढा - मुनगंटीवार
वृक्ष लागवड झाली त्या वेळी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होती. वृक्ष लागवडीची चौकशी करायला काही हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात चौकशी समितीच नेमा. तसेच, राज्यातील शंकाखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिकाही काढा, अशा आशयाचे लेखी पत्र सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला पाठविले आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड हे ईश्वरीय-पर्यावरण कार्य आहे. याच मोहिमेमुळे राज्यातील वनेतर क्षेत्रात जंगल वाढल्याची नोंद केंद्रीय वनसर्वेक्षण विभागाने केली, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच, ही वृक्ष लागवड वन विभागाने नव्हे, तर ३२ विभागांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सत्तर वर्षांतील चौकशी व्हावी - सयाजी शिंदे
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मागच्या सत्तर वर्षांत वृक्ष लागवड कशी झाली, याची चौकशी व्हायला हवी, असे मत खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्‍त केले. बाकी या चौकशीतून काय साध्य होणार, हा प्रश्न आहे. या चौकशीत न पडता, चांगली झाडे लावू आणि ती जगवू, तरुणांना घेऊन ही चळवळ मोठी करण्यात रस आहे, असे मत अभिनेते आणि सह्याद्री देवराई चळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, सरकारे बदलत राहतील आणि चौकशाही होत राहतील, यातून काय साध्य होणार, माहिती नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com