दुचाकीस्वारांनो, काळजी घ्याच! सोलापूर जिल्ह्यात दररोज दोघांचा अपघाती मृत्यू, त्यात 1 दुचाकीस्वार; अडीच वर्षांत 2,086 जणांनी गमावला जीव; मृतांमध्ये 500 पादचारी

सोलापूर शहर-जिल्ह्यात मागील अडीच वर्षांत दोन हजार ८६ जण रस्ते अपघातात ठार झाले आहेत. त्यात बाराशे दुचाकीस्वार आणि पाचशे पादचारी असल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत झाली आहे. रस्ते अपघातात दररोज सरासरी दोघांचा जीव जात असून त्यात एक दुचाकीस्वार आहे.
accident
accidentesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात मागील अडीच वर्षांत दोन हजार ८६ जण रस्ते अपघातात ठार झाले आहेत. त्यात बाराशे दुचाकीस्वार आणि पाचशे पादचारी असल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत झाली आहे. रस्ते अपघातात दररोज सरासरी दोघांचा जीव जात असून त्यात एक दुचाकीस्वार असल्याचेही निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.

सोलापूर ग्रामीणमध्ये आता नऊ तर शहरात १३ अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये सर्वाधिक अपघात सोलापूर-पुणे, सोलापूर-कोल्हापूर, म्हसवड-टेंभुर्णी-कुसळंब, धर्मपुरी-मोहोळ पालखी मार्ग, टेंभुर्णी-पंढरपूर-मंगळवेढा-उमदी, सोलापूर-अक्कलकोट या महामार्गांवर झाले आहेत. सकाळी किंवा सायंकाळी अनेकजण रस्त्यांवरूनच वॉकिंग करायला जातात. त्यांच्याकडून वाहनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अपघातात पादचारी देखील मोठ्या प्रमाणावर ठार झाले आहेत. दुसरीकडे महामार्गांवरून प्रवास करणारे दुचाकीस्वार स्वतःची लेन सोडून भरधाव वाहनांच्या लेनमधून दुचाकी चालवतात. बहुतेक दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवाना देखील नसतो. याशिवाय अनेकजण शेत, घर, कामाचे ठिकाण जवळ असल्याने महामार्गाचा दुभाजक तोडून शॉर्टकट प्रवास करतात.

दुचाकीला बाजूचे आरसे देखील नसतात, अशी अपघाताची व अपघाती मृत्यू वाढण्याची कारणे असल्याच्या नोंदी वाहतूक पोलिसांकडे आहेत. अडीच वर्षांत सोलापूर शहराच्या हद्दीत १९४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये करमाळा, माढा, मोहोळ, मंगळवेढा व सोलापूर तालुका या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक मृत्यूची नोंद असून आता वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर नियमित कारवाई केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

नियम पाळल्यास अपघात होणार नाहीत

रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये महामार्गांवरून पायी जाणारे लोक आणि वाहतूक नियम मोडणारे दुचाकीस्वार सर्वाधिक आहेत. जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) कमी झाली, पण अपघात कमी झालेले नाहीत. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांवर नियमित कारवाई सुरू आहे, तरीपण प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास कोणालाही रस्ते अपघातात जीव गमावावा लागणार नाही.

- बाळासाहेब भरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक), सोलापूर ग्रामीण

दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत ५५ टक्के अपघात

सोलापूर जिल्ह्यातून १४ महामार्ग जातात. जिल्ह्यातील सर्वाधिक रस्ते अपघात दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत झाले आहेत. त्यातही दुपारी चार ते रात्री १२ या वेळेत एकूण अपघातांपैकी ५५ टक्के अपघात झाल्याची बाब समोर आली आहे. त्या वेळेत शेतकरी, कामगार, नोकरदार कामावरून घरी जात असतात आणि याचवेळी शाळा देखील सुटतात. त्यामुळे या वेळेत सर्वाधिक अपघात व मृत्यू होत असल्याचेही निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी व पादचाऱ्यांनी त्या वेळेत अपघात होऊन आपला जीव जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

अडीच वर्षांतील अपघाती मृत्यू

  • साल एकूण मृत्यू दुचाकीस्वार पादचारी अन्य

  • २०२३ ७३५ ४३० १७८ १२७

  • २०२४ ८७५ ५३७ २१४ १२४

  • मे २०२५ पर्यंत २८२ १३९ ६३ ८०

  • एकूण १,८९२ १,१०६ ४५५ ३३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com