अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! - उदय सामंत

Uday-Samant
Uday-Samant

मुंबई - अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, अशी भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सूचना केल्याने पालक आणि विद्यार्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर होण्यासाठी मी तातडीने आयोगाला पत्र लिहून आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर यूजीसीकडून काय उत्तर येते याची वाट पाहू, असेही त्यांनी म्हटले आहे.  

अंतिम वर्षांच्या परीक्षेवर राजकारण होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला. परीक्षेच्या निर्णयासाठी आम्ही विद्यार्थ्यांना अडचणीत आणणार नाही. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले आहेत; मात्र युजीसीच्या २९ तारखेच्या पत्रात परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचा उल्लेख आला असता, तर आम्ही तयारी केली असती; मात्र आता युजीसीने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करून संभ्रम निर्माण केल्याचे सामंत म्हणाले. 

यूजीसीने पर्याय दिले नाहीत
यूजीसीने परीक्षा घ्या, अशी सूचना केली आहे; मात्र परीक्षा घेण्याबाबत कोणतेही पर्याय दिलेले नाहीत. आज जे विद्यार्थी गावी गेलेत ते कसे परीक्षा देणार?, तसेच प्रश्‍नपत्रिका कोण काढणार?, जे कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत त्यांचे काय करावयाचे?, असे अनेक प्रश्‍न आमच्यापुढे आहेत. त्यामुळे परीक्षा न घेण्याची आमची भूमिका कायम असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एटीकेटीचे विद्यार्थीही पास
एटीकेटीच्या संदर्भात १३ विद्यापीठांतील कुलगुरूंनी आपले मत दिले आहे. सरासरी गुणांच्या आधारे एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पास करावे, अशी शिफारस याबाबत नेमलेल्या समितीने केली आहे. यासह समितीने दुसरा पर्याय ग्रेस मार्क देण्याचा दिला आहे. तसेच पुन्हा एटीकेटीची परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी शिफारस माझ्याकडे करण्यात आली आहे. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करू, असे सामंत म्हणाले.

राज्यातील कुलगुरूंनाही परीक्षा नको
राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरूंनी सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेता येणार नसल्याचे ठाम सांगितले आहे. आम्ही कुलगुरूंच्या पाठीशी आहोत. काही प्राध्यापक संघटनांनी परीक्षा प्रकियेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे सांगितले आहे. तज्ज्ञ परीक्षा घेऊ नयेत, असे सांगत असल्याने आम्ही त्यावर ठाम आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले. 

जनता सर्व ओळखते
अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री या नात्याने मी यूजीसीला पत्र पाठवले होते. त्याचे उत्तर आजवर आलेले नाही. यूजीसीने यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना आता पुन्हा यूजीसी परीक्षा घेण्यास सांगत आहे. याबाबत पत्रकारांनी सामंत यांना या प्रश्‍नामध्ये राजकारण होत आहे का, असे विचारले. यावर सामंत यांनी मला यामध्ये राजकारण माहीत नाही; मात्र जनता सगळे ओळखते, असे उत्तर दिले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com