मुंबई - राज्यातील 14 अकृषी विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने 15 जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. तब्बल 60 लाख विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. याच मागण्यांसाठी 29 जूनला एक दिवसाचा लाक्षणिक संपही केला जाणार आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि बिगर सरकारी महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करण्यासह अकृषी विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य 26 मागण्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स फोरम या महासंघांकडून पाठपुरावा सुरू आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 10 जूनपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.
याची दखल घेतली जात नसल्याने तिन्ही संघटनांनी 29 जुलैला एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा इशारा दिला आहे. यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 15 जुलैपासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा महासंघांनी दिला आहे.
|