पाणी जपून वापरा! पाऊस न पडल्यास उजनी जाणार उणे ७० टक्के; शेतीला फटका; सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा सांगोल्यासाठी सोडले पाणी

उजनीत २४ टक्के पाणीसाठा असून आता सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढ्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडले आहे. धरणातील 5 टीएमसी पाणी या आवर्तनासाठी जाणार असल्याने धरण पुन्हा उणेच्या उंबरठ्यावर येईल. पावसाने अशीच ओढ दिल्यास उन्हाळ्यात धरण तब्बल ७०टक्के मायनस जाईल.
उजनी
उजनीsakal

सोलापूर : उजनी धरणात २४ टक्के पाणीसाठा असून आता सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढ्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडले आहे. धरणातील पाच टीएमसी पाणी या आवर्तनासाठी जाणार असल्याने धरण पुन्हा उणेच्या उंबरठ्यावर येईल. पावसाने अशीच ओढ दिल्यास उन्हाळ्यात धरण तब्बल ७० टक्क्यांपर्यंत मायनस जाईल आणि धरणावरील अवलंबून बहुतेक पाणीपुरवठा योजना पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत काही दिवस बंद राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

पावसाळ्यामुळे जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्याची गरज भासत नाही. पण, नोव्हेंबरनंतर मेपर्यंत दोन ते तीन आवर्तने सोडली जातात. मात्र, यंदा तशी परिस्थिती नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून उजनीतील पाणी सध्या पिण्यासाठीच राखून ठेवले जात आहे.

दरम्यान, सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठल्याने धरणातून पाच हजार क्युसेकने भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी साधारणत: २९ सप्टेंबरपर्यंत औजमध्ये पोचणार आहे. ३० सप्टेंबरला धरणातून सोडलेले पाणी बंद केले जाईल दरम्यान, अद्यापही धरणाला मोठ्या पावसाची आशा आहे.

धरण ३३ टक्क्यांवर गेल्याशिवाय शेतीला पाणी सोडणे अशक्यच आहे. पावसाचा खंड असाच राहिल्यास जिल्ह्यात दुष्काळ असणार आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्यासाठी टॅंकर सुरु होतील, अशीही सद्य:स्थिती आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले जात आहे.

आलमट्टीतून तहान भागविण्याचा प्रयत्न

जून ते १९ सप्टेंबर या तीन महिन्यात अद्यापही धरणात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सोलापूर शहरासह जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी म्हणून कर्नाटकातील आलमट्टी धरणातून औज बंधाऱ्यात पाणी सोडण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कर्नाटक सरकारने तो नाला स्वच्छ करून कॅनॉल दुरुस्त करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

औजमधील पाणी कमी होऊ लागल्यावर काही दिवस त्या कॅनॉलमधून औजमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी प्रस्तावातून करण्यात आली आहे. उजनीतून तातडीने पाणी सोडावे लागणार नाही, उन्हाळ्यातही उजनीतील पाणी पिण्यासाठी पुरावे, असा प्रयत्न सुरु आहे. पुढील महिन्यात दोन राज्यांच्या मुख्य अभियंत्यांची बैठक होईल, त्यावेळी पाणी सोडण्याचे नियोजन ठरणार आहे.

उजनीची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ७५.७९ टीएमसी

  • जिवंतसाठा

  • ११.१५ टीएमसी

  • उपयुक्त साठ्याची टक्केवारी

  • २०.५३ टक्के

  • उजनीतून सोडलेले पाणी

  • ५००० क्युसेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com