मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर गणेशविसर्जनापूर्वी म्हणजे येत्या दोन दिवसांत युतीची घोषणा करण्यात यावी, असा भाजप नेत्यांचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा पुढील टप्पा येत्या शुक्रवारपासून (ता. 13) सुरू होणार आहे. त्यापूर्वीच युतीची घोषणा करण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला असल्याचे समजते.
महाराष्ट्राचे भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांना प्रत्येक मतदारसंघातून स्वबळाचा निरोप मिळत असताना प्रत्यक्षात हा निर्णय आमच्यावर सोडून द्या, असे सांगण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्या बड्या नेत्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी युतीबाबत मात्र मौन न बाळगता ठाम मते व्यक्त केली असली तरी, महाराष्ट्रात युती कायम ठेवावी, असे वारंवार ध्वनित केले जाते आहे. व्यवस्थाविषयक झालेल्या आजच्या बैठकीत भूपेंद्र यादव यांना विभागवार भाजप-शिवसेनेच्या यशाचा आराखडा सादर केला गेला. युती करायचीच असेल तर किमान 170 मतदारसंघ भाजपनेच लढावेत, असा आग्रह धरण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याशी काही मतदारसंघांच्या आदलाबदलीबाबत आज चर्चा केली. गेल्या निवडणुकीत भाजपने 122 जागांचा आग्रह धरला होता. तो मान्य न झाल्याने युती तुटली. मात्र अंतिमतः भाजपने 123 मतदारसंघ जिंकले.
मोदी यांचा प्रभाव आणि जम्म-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे निर्माण झालेले वातावरण लक्षात घेता सध्या सामोपचाराची भूमिका घ्यावी, अशी भूमिका शिवसेनेमध्ये एका गटाने मांडली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युतीच्या बाजूनेच कौल दिला आहे.
भाजपने आज सकाळपासून बैठकांचा सपाटा चालविला होता. या बैठकांमध्ये प्रत्येक महसूल विभागात किती जागा लढवाव्यात याचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीची घोषणा होताच मतदारसंघांकडे लक्ष द्यावे लागणार असल्याने सर्व चर्चा गणेशोत्सवादरम्यानच पूर्ण व्हाव्यात, असा प्रस्ताव गिरीश महाजन यांनी ठेवल्याचे समजते. कोकण विभागात भाजपला फारसे स्थान नसल्याने तेथील जागा शिवसेनेला मोकळ्या हाताने द्याव्यात, विदर्भात मात्र स्वतःकडे झुकते माप ठेवावे, असा भाजपचा विचार आहे.
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय - उद्धव ठाकरे
भाजपबरोबर युतीसाठी बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत दोन दिवसांत बैठक होणार असून, त्यात निर्णय होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. 'इतरांना काय बोलायचे ते बोलू द्या. युतीबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांबरोबर घेणार आहे,'' असे उद्धव यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ""आंबेडकर यांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवेसी यांच्यावर बोलावे.''
शिवरायांच्या गड-किल्ल्यांबाबत कोणी वेडेवाकडे करेल असे वाटत नाही, म्हणून मी आतापर्यंत काही बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'देशातील घुसखोर बांगलादेशी आहेत. त्यांना देशाच्या बाहेर काढायलाच हवे, कोणी त्यांना मांडीवर बसविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांनी बसवावे,'' अशी टिप्पणीही त्यांनी केली.
|