Vishwa Marathi Sahitya Sammelan : मराठी भाषेचा डंका आंतरराष्ट्रीय क्षितिजावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे येत्या २६ नोव्हेंबरला दहावे विश्व मराठी साहित्य संमेलन लक्षद्वीपला आंतरराष्ट्रीय जहाजावर रंगणार आहे.
जगातील हे पहिलेवहिले तरंगते साहित्य संमेलन ठरणार असून, ‘भारतीय सागरी सुरक्षा आणि जलवाहतूक’ हा यंदाच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा विषय आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष तथा शिवसंघ प्रतिष्ठानचे संस्थापक नीलेश गायकवाड यांनी दिली. (Vishwa Marathi Sahitya Sammelan on ship this year news)
संमेलनाचे अध्यक्षपद नौदलाचे निवृत्त अधिकारी आणि राष्ट्रपतिपदक, ‘शौर्यचक्र’ आणि नौसेना मेडल विजेते अजय चिटणीस भूषवतील. संमेलनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस करतील.
सोशल नेटवर्क फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक पराग पोतदार, डॉ. प्रसाद पिंपळखरे, संमेलनाचे कार्यकारी संचालक जीवन हेंद्रे, मनीष केळकर, ॲड. विजय मंडलिक आदी उपस्थित राहतील. यंदाच्या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण संमेलनाचे माजी अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले.
गेली नऊ वर्षे वैश्विक स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरत आहे. अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, मॉरिशस, भूतान आणि इंडोनेशिया येथील बाली, दुबई आणि कंबोडिया येथे ही संमेलने भरली आहेत. संमेलनाचे दहावे पुष्प आंतरराष्ट्रीय जहाजावर होणार आहे.
त्यामुळे हे संमेलन सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी स्व. निनाद बेडेकर, विनय सहस्रबुद्धे, विजय कुवळेकर, डी. एस. कुलकर्णी, श्याम जाजू, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. गो. बं. देगलूरकर, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले आदींनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
मराठी भाषा ही जागतिक स्तरावर नावाजली जावी, ती व्यवहाराची भाषा बनावी, त्या अनुषंगाने काम करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. त्याचबरोबर मराठी साहित्याची व्याप्ती वाढावी, यासाठी शिवसंघ प्रतिष्ठानचा प्रयत्न असतो.
जागतिक समुदायाशी मराठी माणसांना जोडणे, जगभरातील मराठी माणसांचे संघटन करणे, मराठी माणसांचे अनुभवविश्व समृद्ध करणे, जागतिक अर्थव्यवस्थेत मराठी माणूस महत्त्वाचा होणे, मराठी भाषा जागतिक दर्जाची व्हावी, मराठी साहित्य व लेखन हे कथा, कविता कादंबऱ्या, ललितकथा अशा ललित लेखनापुरतेच मर्यादित न राहता इतरही क्षेत्रातील माहितीपूर्ण लिखाण, ज्ञान प्रगल्भ व्हावे आणि ते लिहिणाऱ्यांना लेखकाचा दर्जा मिळावा, ही संमेलनाचा मुख्य हेतू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.