मुंबई - 'ईव्हीएम'मधील मतदानाबरोबरच "व्हीव्हीपॅट'मधील मतदानाचीही मोजणी करण्याची आवश्यकता असून लवकरच तशी मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. या संदर्भात देशातील सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकदा एकत्र बैठक घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
देशभरात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत संशयाचे वातावरण असताना भाजप वगळता सर्व विरोधी पक्षांनी "ईव्हीएम' बंद करण्याबाबची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. मात्र, ईव्हीएम बंद करता येणार नसल्याचे सांगत मतदान केलेली पावती व्हीव्हीपॅट तंत्राच्या साह्याने काढण्याचा निर्णय आयोगाने घेतला. पण, व्हीव्हीपॅटचे मतदान मोजले जात नाही, त्यामुळे "ईव्हीएम'सोबतच व्हीव्हीपॅटमधील मतदानाची मोजणी करायला हवी, अशी मागणी करणार असल्याचे शरद पवार म्हणाले. "राष्ट्रवादी'च्या प्रमुख नेत्यांसोबत कॉंग्रेससोबतच्या जागावाटपाची बोलणी करण्यासाठीच्या बैठकीनंतर ते माध्यमांसोबत बोलत होते.
'अनेक मतदारसंघांतून "ईव्हीएम'बाबतच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्यामुळे सक्षम लोकशाहीसाठी "ईव्हीएम'ऐवजी मतपत्रिकांचा वापर करायला हवा, ही मागणी जोर धरत आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत संशयास्पद असलेली कोणतीही यंत्रणा रद्द करायला हवी. व्हीव्हीपॅट तंत्राने मतदाराला कोणत्या पक्षाला मत दिले हे समजत असले तरी त्याचा पुरावा मतदाराकडे राहत नाही. काही प्रमाणात व्हीव्हीपॅटची मते मोजली जातात. मात्र, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतदानाची पडताळणी करताना त्यामध्येही दोष आढळले आहेत,'' असे पवार म्हणाले. त्यामुळे, केवळ "ईव्हीएम'चेच मतदान मोजण्यापेक्षा व्हीव्हीपॅटमधील मतदानाच्या पावत्यादेखील मोजायला हव्यात, अशी सर्व विरोधी पक्षांची मागणी असून, आगामी पंधरा दिवसांत त्याबाबत राष्ट्रीय स्तरावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
|