
तात्या लांडगे
सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारी सोहळ्यासाठी यंदा १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये येतील, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात दीड ते दोन लाख भाविक मावतात, पण नदी पात्रात पाण्याचा विसर्ग १५ ते २० हजार क्युसेकपर्यंत राहिल्यास वाळवंटात वारकऱ्यांना थांबता येणार नाही. त्यामुळे उजनीतून भीमेत सोडलेला विसर्ग १ जुलैपासून पाच हजार क्युसेक केला जाणार आहे. तर वीर धरणातून सोडलेला विसर्ग २ जुलैपासून पूर्णपणे बंद केला जाणार आहे.
आषाढी वारीचा सोहळा ६ जुलै रोजी पंढरीत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त, जिल्हा प्रशासनाने आरोग्य व्यवस्था, दर्शनरांग अशा सर्व बाबींचे नियोजन केले आहे. पण, चंद्रभागा नदीतील विसर्ग सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, तरीपण सध्या उजनीत १० हजार आणि वीर धरणात सात हजार क्युसेकची आवक सुरू आहे. जुलैअखेर दोन्ही धरणांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत पाणी असणे अपेक्षित आहे. त्यानुसार सध्या वरून येणारा विसर्ग पाहून दोन्ही धरणांतून नद्यांद्वारे अतिरिक्त पाणी सोडून दिले जात आहे. परंतु, आषाढी वारी काळात चंद्रभागा नदीत पाच हजारापेक्षा जास्त विसर्ग राहणार नाही, याची दक्षता जलसंपदा विभागाकडून घेतली जात आहे. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आता १ व २ जुलैपासून केली जाणार असून, विसर्ग कमी केल्यामुळे चंद्रभागा नदी पात्रातील पूरस्थिती टळणार आहे.
उजनी व वीर धरणाची सद्य:स्थिती
(उजनी धरण)
एकूण साठवण क्षमता
१२० टीएमसी (११० टक्के)
सध्याचा पाणीसाठा
१०२ टीएमसी (७२ टक्के)
दौंडवरून येणारी आवक
१०,४०० क्युसेक
नदीत सोडलेला विसर्ग
१५,००० क्युसेक
-------------------------------------------------
(वीर धरण)
एकूण साठवण क्षमता
९.८३ टीएमसी
सध्याचा पाणीसाठा
७.३९ टीएमसी (७५ टक्के)
धरणात येणारी आवक
७,१०० क्युसेक
नदीत सोडलेला विसर्ग
५,२०० क्युसेक
जुलैअखेर उजनीत राहणार ९४ टक्के पाणी
जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार, उजनी धरणात ३० जूनपर्यंत ७४ टक्के तर जुलैअखेर ९४ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा अपेक्षित आहे. त्यानुसार आता उजनीतील पाणीसाठा स्थिर ठेवण्यात आला आहे. १ ते ८ जुलैनंतर पुन्हा दोन्ही धरणांत वरून येणारा विसर्ग पाहून नीरा, भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे. आषाढी वारी काळात सर्व विसर्ग धरणात साठविला जाणार असून, काही प्रमाणात पाणी कॅनॉलमधून सोडले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.