सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्तांची तहान भागविण्यासाठी सध्या पाच हजार 726 टॅंकर सुरू आहेत. मात्र, दैनंदिन मंजूर खेपांप्रमाणे पाणीवाटप होत नसल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी जुनाट व गळके टॅंकर सुरू असल्याचेही पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर टॅंकरच्या खेपांचा अहवाल दररोज सादर करावा, असे निर्देश राज्य सरकारने गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) दिले आहेत.
राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत दर आठवड्याला सरासरी 300 टॅंकर सुरू होत आहेत. सध्या राज्यातील चार हजार 492 गावांमध्ये आणि नऊ हजार 670 वाड्या-वस्त्यांवर टॅंकर सुरू आहेत. परंतु, शासकीय निकषांप्रमाणे अजूनही टॅंकर मिळत नसल्याचे चित्र अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या 233 शासकीय, तर पाच हजार 492 खासगी टॅंकर राज्यात सुरू आहेत.
त्यातील काही टॅंकर गळके व जुनाट असल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी गटविकास अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकाच्या निर्देशानुसार तालुक्यातील टॅंकरच्या खेपांचा दैनंदिन अहवाल पाठविला जात आहे. काही खेड्यांमध्ये "जीपीएस' प्रणाली चालत नाही. परंतु, संबंधितांकडून खेपांची माहिती घेतली जात आहे. जुना अथवा गळका टॅंकर बदलून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, तो अद्याप मिळाला नाही.
- अजिंक्य येळ्ळे, गटविकास अधिकारी, मोहोळ (जि. सोलापूर)
राज्याची स्थिती
5,726 एकूण टॅंकर
14,159 टॅंकरने पाणी मिळणारी गावे
7,282 टॅंकरची मागणी
260.73 कोटी रु. टॅंकरवरील अपेक्षित खर्च
|