कोकण, घाटमाथ्यावर जोर कायम; धरण क्षेत्रात पाऊस वाढला

मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसाने कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत
weather update maharashtra monsoon konkan Rainfall increased in the dam area pune
weather update maharashtra monsoon konkan Rainfall increased in the dam area puneSakal

पुणे : मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. दमदार पावसाने कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर घाटमाथ्यावरील पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, नागपूुरात दोन दिवसांच्या ब्रेकनंतर वरुणराजाने पुन्हा शहरात दणक्यात एंट्री केली. गुरुवारी दुपारी उपराजधानीत सर्वत्र विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसला. जोरदार पावसामुळे जागोजागी झाडे पडली. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली.

शहरात दीड ते दोन तासांत तब्बल ८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पुढील तीन-चार दिवस आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे.

इगतपुरीमध्ये चांगला पाऊस

नाशिक : मॉन्सूनने इगतपुरीसह त्र्यंबकेश्‍वर अन् पेठ या आदिवासी तालुक्यांत गेल्या २४ तासात चांगली हजेरी लावली. इगतपुरीमध्ये ५०.६, पेठमध्ये ४५.४, तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये ५३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील धरण साठ्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सिंधुदुर्गात जोर पुन्हा वाढला

वैभववाडी ः एक दिवस उघडीप दिल्यानंतर गुरुवारी पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे.

हतनूर धरणाचे ३० दरवाजे उघडले!

जळगाव : दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हतनूर धरणातून तापी नदी पात्रात ४२ हजार ३७८ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तापी नदीच्या मध्य प्रदेशातील उगम स्थानाच्या परिसरातील पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला आहे.

तळियेत घरे उभारणीस सुरुवात

मुंबई : महाड तालुक्यातील तळिये गावातील दरडग्रस्त कुटुंबीयांसाठी घरे उभारण्यास अखेर सुरुवात झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ६३ घरांचे काम सुरू झाले आहे. येत्या दिवाळीपर्यंत या कुटुंबीयांना घरांचा ताबा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी २२ व २३ जुलै रोजी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तळिये आणि आजूबाजूच्या वाड्यांमधील अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com