दुष्काळी मदत कधी मिळणार? अतिवृष्टी, पावसाचा खंड, अवकाळीने ६३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; १० वर्षांत ५ वर्षे बळिराजासाठी अडचणींचीच

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ३० सप्टेंबरपर्यंत १६. ३९लाख हेक्टरचे नुकसान झाले. त्यानंतर पावसाच्या खंडामुळे पिकांनी माना टाकल्या. आता रब्बी हंगामातील अवकाळीचा साडेचार लाख हेक्टरला फटका बसला आहे. ‘कृषी’च्या अंदाजानुसार यंदा खरीप उत्पादनात २२ टक्के घट होणार आहे.
शेतात पावसाचे पाणी शिरल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले.
शेतात पावसाचे पाणी शिरल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले.ssakal

सोलापूर : पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे १५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १६ लाख ३९ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पावसाच्या खंडामुळे ४२ लाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या. आता रब्बी हंगामातील अवकाळीचा साडेचार लाख हेक्टरला फटका बसला आहे. ‘कृषी’च्या अंदाजानुसार यंदा खरीप उत्पादनात २२ टक्के घट होणार असून पाण्याअभावी रब्बीचीही अशीच दुरवस्था आहे.

पावसाळ्याच्या सुरवातीला काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तर अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्याने खंड राहिला. खरीप पिके अक्षरश: शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वाया गेली. मूग, उडीद, सोयाबीन, भात, भुईमूग, कापूस, तूर अशा पिकांचे मोठे नुकसान झाले.

कृषी विभागाच्या वार्षिक अंदाजपत्रकानुसार मागील पाच वर्षांच्या सरासरीप्रमाणे खरीपात ७९.८९ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, यंदा अतिवृष्टी व पावसाचा खंड, या कारणांमुळे खरीपातील एकूण १५३ लाख हेक्टरपैकी जवळपास ६३ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली. त्यामुळे खरीपातून यंदा ६२.६७ लाख टन उत्पादन येईल, असा ‘कृषी’चा सध्याचा अंदाज आहे. दुसरीकडे परतीचा पाऊस समाधानकारक झाला नसल्याने बहुतेक जिल्ह्यात ‘रब्बी’च्या पेरण्या विलंबाने झाल्या. सुरवातीला पेरण्या झालेल्या पिकांना आता अवकाळीचा मोठा फटका बसला. त्यात केळी, द्राक्ष अशा फळबागांचाही समावेश आहे. अवकाळीच्या तडाख्याने २३ जिल्ह्यांमधील साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

दुष्काळाची मदत अजूनही नाही

राज्यातील ४० तालुके आणि एक हजार ४१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे २६०० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्याप बाधित शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. दुष्काळात वाढलेल्या महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनाही अजून राज्य सरकारकडून मदत जाहीर झालेली नाही. दुसरीकडे पीक विम्याचा अग्रिम देखील सर्व पिकांचा मिळालेला नाही.

यंदाच्या ‘खरीप व रब्बी’ची स्थिती

  • खरीपाचे एकूण क्षेत्र

  • १५३ लाख हेक्टर

  • अतिवृष्टीने बाधित क्षेत्र

  • १६.३९ लाख हेक्टर

  • पावसाअभावी बाधित अंदाजे क्षेत्र

  • ४२ लाख हेक्टर

  • रब्बीचे एकूण क्षेत्र

  • ५० ते ५६ लाख हेक्टर

  • अवकाळीने बाधित क्षेत्र

  • ४.५२ लाख हेक्टर

दहा वर्षांत पाच वर्षे नुकसानीची

नैसर्गिक आपत्तींचा सामना करून नव्याने सुरवात करणाऱ्या बळिराजाला २०१२-१३, २०१४-१५, २०१५-१६, २०१७-१८ व यंदा, या पाच वर्षांत शेतकऱ्यांना सातत्याने नुकसानीचा सामना करावा लागला आहे. या काळात तेलबिया, कापूस, तृणधान्याच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com