‘दुष्काळा’साठी कोणता मुहूर्त पाहताय? - अजित पवार

‘दुष्काळा’साठी कोणता मुहूर्त पाहताय? - अजित पवार

पुणे - राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळ जाहीर न करता, कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात केला. 

केवळ घोषणाबाजी करून लोकांची फसवणूक करणारे हे फेकू सरकार असल्याची टीका त्यांनी केली. किमान आता तरी शेतकऱ्यांचा अंत न पाहता, त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी पवार यांनी या वेळी केली.

‘‘राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानासाठी तब्बल सात हजार कोटी रुपये खर्च केले; पण या अभियानाचा काहीच फायदा झालेला नाही. हे सर्व पैसे पाण्यात गेले आहेत. ऑक्‍टोबर महिन्यातच भूजल पातळी सरासरी एक ते दीड मीटरने खाली गेली आहे. या योजनेबाबत भ्रष्टाचाराचेही आरोप झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरकारने या योजनेबाबत आत्मपरीक्षण करण्याबरोबरच भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही चौकशी केली पाहिजे,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले. 

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी बोलताना पवार यांनी ही मागणी केली. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपासून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात पवार व सुळे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रदेश सरचिटणीस जालिंदर कामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, माजी आमदार पोपटराव गावडे, अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, प्रा. सविता दगडे यांच्यासह जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ (कात्रज डेअरी) आदी संस्थांचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष सहभागी झाले होते.

राज्यात दुष्काळ, खरीप व रब्बी पिकांचे झालेले नुकसान, भारनियमन, बेरोजगारी आणि वाढती महागाई या पाच बाबींमुळे सर्वसामान्य जनता भरडून गेली आहे. पावसाने दगा दिल्याने, माणसांना आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, पिकांच्या नुकसान भरपाईसाठी प्रतिहेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, भारनियमन रद्द करावे, राज्यातील सर्व विभागांमध्ये मिळून रिक्त असलेल्या लाखो जागा भराव्यात. जेणेकरून बेरोजगारीचा प्रश्‍न काही अंशी का होईना कमी होऊ शकेल. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी पावले उचलावीत.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com