'विधानसभेचं विद्यापीठ' म्हणवले जाणारे गणपतराव देशमुख कोण होते?

'विधानसभेचं विद्यापीठ' म्हणवले जाणारे गणपतराव देशमुख कोण होते?

सांगोला : शांत, संयमी त्याला तात्वीकतेची जोड, निष्ठा, चारित्र्य, सचोटी व प्रामाणिकपणा, सामान्यांच्या प्रश्नासाठी सतत झगडणारे राजकारणी, सर्व क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख होते. विक्रमी वेळा आमदार असताना सुद्धा कोणत्याही प्रकारे बडेजाव न करता सतत जनसामान्यांसाठी त्यांच्या प्रश्नासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी ते सतत आवाज उठवत. अशा या ज्येष्ठ नेत्याचे निधनाची बातमी समजताच जनसामान्यांमधून आमच्या "राजकारणातील देव माणूस हरपला" अशी भावना व्यक्त केली जात आहे.

पेशाने वकील असतानासुद्धा कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या समस्या त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होत्या. दुसऱ्याच्या दुःखाची ज्याला जाणीव होते तोच खरा आत्मज्ञानी मानला जातो. त्याप्रमाणेच गणपतराव देशमुख यांना या कष्टकरी जनतेचे दुःख जाणवत होते. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणात उतरले. सांगोला विधानसभा मतदार संघात 1962 ला ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. 1972 व 1995 चा अपवाद वगळता ते 11 वेळेस विधानसभा जिंकत देशात विक्रम नोंदविला होता.

'विधानसभेचं विद्यापीठ' म्हणवले जाणारे गणपतराव देशमुख कोण होते?
तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचं निधन

शांत, संयमी व अभ्यासु नेतृत्व -

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे स्वभावाने अत्यंत शांत होते. भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आदराने त्यांची विचारपूस करत असत. त्यानच्याजवळ स्वतःची समस्या घेऊन कोणीही आले तर ते प्रथम समस्या जाणून घेत व त्याच्या व त्याच्या निराकरणासाठी प्रयत्न करीत. त्याची स्वतःची समस्या सोडविल्यानंतर ते आवर्जून गावाची परिस्थिती काय आहे? गावात काय अडचणी आहेत? याबाबत ते आपुलकीने विचारीत सांगणाराही पोटतिडकीने आपल्या गावाच्या समस्या सांगत होता. परंतु प्रश्न ऐकून घेतल्यानंतर त्याचे निराकरण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा ही ते करत असत. कोणतीही चुकीची तक्रार त्यांच्याकडे चालत नसे. प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यासा होता. स्वच्छ प्रतिमा साधी राणी तसेच सर्वसामान्य तुमच्यासाठी 24 तास ते उपलब्ध असल्याने प्रत्येकाला ते आपलेसे वाटत होते.

पाणीप्रश्नासाठी आयुष्यभर संघर्ष -

सांगोला तालुका हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने पाऊसमान कमी. यामुळे येथील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. आबासाहेबांनी दुष्काळी सांगोला तालुक्याची ओळख पुसण्यासाठी टेंभू, म्हैसाळ योजना, तसेच शिरभावी गावची 81 पाणीपुरवठा योजना, नीरा उजवा कालव्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावांनाही पाणी पुरवठा करण्यासाठी ते सतत बैठका मेळावे व आंदोलन करीत असत. आबासाहेबांच्या प्रयत्नाने 1995 रोजी टेंभू उपसा सिंचन योजनेचा सर्वे करण्याचा आदेश दिला. 20 ऑक्टोबर 1995 रोजी कडेपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या शुभहस्ते टेंभू योजनेचे भूमिपूजन ही झाले. यावेळी गणपतराव देशमुख व पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. पाणी परिषदा घेऊन तालुक्यातील विरोधी सरकारलाही दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी भाग पाडणारे आबासाहेब हे एकमेव राजकारणी होते.

तात्वीक राजकारणी -

सध्याचे राजकारण व राजकारणी डोळ्यासमोर आले की त्यांच्यात असलेला भ्रष्टाचारी, लोभसपणा, स्वार्थापणा लगेच दिसून येतो. परंतु आबासाहेब हे निस्वार्थीपणे राजकारण करणारे व तात्विक राजकारणी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. आपल्या पदाचा कोणताही बडेजाव न करता वैयक्तिक स्वार्थ लाभ त्यांनी कधीही त्यांच्या आचरणातून दाखवून दिला नाही. सामान्यांच्या प्रश्नासाठी, तालुक्यातील विविध योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले तत्व कधीही सोडले नाही. एकच पक्ष, एकच मतदारसंघातून अकरा वेळा विक्रमी आमदार झालेले गणपतराव देशमुखांसारखा राजकारणी देशात दुसरा सापडणार नाही. राजकारणात त्यांना मंत्रिपदाच्या, पक्षांतराच्या अनेक संधी असतानाही त्यांनी त्याचा लोभ न ठेवता आपले तत्व मात्र सोडले नाही.

ध्येयवादी नेतृत्व -

गरीब लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर ते नेहमी आवाज उठवित असत. त्यांचे राजकारणातील स्थान हे त्यांच्या पक्षाचे ध्येयधोरणे व त्यांच्या वैचारिक पायावर आधारित होते. मार्क्सवादी विचारांना प्रमाण मानणाऱ्या शेकाप पक्षाच्या माध्यमातून त्या पक्षाच्या धोरणानुसारच आयुष्यभर आपल्या ध्येयापासून कधीही बाजूला झाले नाहीत. आयुष्याच्या शेवटपर्यंत सामान्य लोकांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील होते सभागृहात व सभागृहाबाहेर प्रश्नांची मुद्देसूद मांडणी व वैचारिक पायांच्या आधारावर त्यांची ध्येयनिष्ठ राजकारणाची पद्धत सर्वांनाच भावते. आमदार आमदार म्हणून काम करीत असताना त्यांनी नेहमी वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक कामावर भर दिला.

सहकारातून विकासाचा मूलमंत्र -

गणपतराव देशमुख यांनी उभा केलेल्या सर्वच सहकारी संस्था त्यांच्या देखरेखीखाली अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. 1975 च्या आणीबाणी विरोधी सभा घेऊन विरोध केल्यामुळे त्यांना अटक होऊन तुरुंगवास भोगावा लागला होता. 1978 सरकारमध्ये आबासाहेब यांनी शरद पवार मुख्यमंत्री असताना कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी सहकाराचा मोठा पाया निर्माण केला. 1980च्या नंतर त्यांनी सूत गिरणी उभारली. तसेच सूत गिरणीबरोबरच त्यांनी महिला सूतगिरणी उभारून व अत्यंत बिकट परिस्थितीच्या काळातील यशस्वीपणे चालून महिलांनाही पुरुषांबरोबर काम करण्याची संधी दिली. सांगोल्यात औद्योगिक वसाहतीची स्थापना करून त्यांनी लघु उद्योगास प्रोत्साहन दिले आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखाना व सांगोला सहकारी कारखाना वाकी शिवणे यांच्या निर्मितीत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता त्यांच्या पक्षनेतृत्वाच्या ताब्यातील सर्व संस्था व्यवस्थित सुरू आहेत.

सांगोला तालुक्याला असे श्रेष्ठ दर्जाचे ऋषितुल्य नेतृत्व मिळणे येथील जनतेचे भाग्यच आहे. सामान्यांना कायमच आपलेसे वाटणारे भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने तालुक्या बरोबर राज्यातही राजकारणात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com