उद्योग येण्यासाठी दळणवळणाची सुविधा महत्त्वाची असते. यासाठी अहमदनगर - बीड - परळी लोहमार्गाला गती देण्यासह जिल्ह्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणले. विरोधकांची राज्यात सत्ता असताना जिल्ह्याला काय दिले, असा सवाल खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना केला. राज्यात महाविकास आघाडी सरकाच्या तीन वर्षांच्या काळात रेल्वे मार्गाच्या ५० टक्के निधीचा वाटाही वेळेत दिला नाही, असा आरोपही त्यांनी केला.
बुधवारी (ता.३१) पत्रकार परिषदेत डॉ. मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळातील योजनांचा ऊहापोह केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी डॉ. मुंडेंवर नऊ वर्षांत खासदार म्हणून अपयशी असल्याच्या टीकेबाबत विचारल्यानंतर त्यांनी वरील उत्तर दिले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रवक्ते राम कुलकर्णी, प्रा. देविदास नागरगोजे, अजय धोंडे. विक्रांत हाजारी, अजय सवाई, जगदीश गुरखुदे, चंद्रकांत फड आदींची उपस्थिती होती.
डॉ. मुंडे म्हणाल्या, मोदींनी देशाला दहशतवादापासून मुक्त करत भारताची जागतिक प्रतिष्ठा उंचावली. ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, गरिबांसाठी अडीच कोटी घरे, १९ कोटी ७२ लाख स्वच्छतागृह बांधून दिले. नऊ कोटी कुटुंबांना उज्वला योजनेद्वारे मोफत गॅस सिलिंडर दिले. किसान सन्मानमधून जिल्ह्यात पाच लाख १३ हजार शेतकऱ्यांना, अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतून १६ लाख ३४ हजार कुटुंबांना लाभ मिळाला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून ३५ हजार घरे मिळाली.
महिला खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता
महिला खेळाडूंच्या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी भूमिका यावेळी डॉ. प्रीतम मुंडे यांनी मांडली. केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी होऊन सत्य समोर यायला हवे होते असेही त्या म्हणाल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.