त्या भूमीत लष्करी अधिकाऱ्यांचा ताफा थांबवला अन् यशवंतराव रडायला लागले! Yashwantrao Chavhan Birth Anniversary | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Chavhan Birth Anniversary

Yashwantrao Chavhan Birth Anniversary : त्या भूमीत लष्करी अधिकाऱ्यांचा ताफा थांबवला अन् यशवंतराव रडायला लागले!

 यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. ते काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते.

यशवंतरावांची आज जयंती. त्याच निमित्ताने त्यांच्या जीवनातील एक हळवी बाजू जाणून घेऊयात. यशवंतरावांच्या जीवनात एक असा किस्सा घडला होता. ज्यामूळे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या लष्करी ताफ्यातील अधिकारीही अवाक झाले होते.

१९६२मध्ये भारत-चीन सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली. त्यांनी युद्धानंतरची कठीण परिस्थिती शांतपणे हाताळली, सैन्य दलांना सक्षम करण्यासाठी अनेक पर्याय निवडले आणि शत्रुत्व थांबवण्यासाठी चीनशी वाटाघाटी केल्या. पंडित नेहरू. सप्टेंबर १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ते लाल बहादूर शास्त्री सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही होते.

यशवंतराव चव्हाण भारताचे संरक्षणमंत्री होते तेव्हा एक घटना घडली. त्या घटनेतुन यशवंतरावांच्या मनातील एका हळव्या माणुसपणाची ओळख होते. काय आहे ती घटना जाणुन घेऊया

एके दिवशी यशवंतरावांच्या मोटारींचा ताफा पंजाबातुन दिल्लीकडे निघाला होता. यशवंतराव प्रवासात रस्त्यावर लागणारी एक एक गावे मागे टाकत दिल्लीकडे मार्गक्रमण करत होते. अचानक एका गावातून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला ‘पानीपत’ नावाचा नामफलक दिसला. क्षणार्धात यशवंतरावांनी चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. आपला पुढचा नियोजित प्रवास खंडित करून यशवंतराव १७६१ साली ज्याठिकाणी पानिपताचा युद्धप्रसंग घडला होता, त्या ‘काला आम’ नावाच्या ठिकाणी ते पोहोचले.

गाडीतुन उतरुन यशवंतराव तिथल्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधींच्या समोर आले. समाधींसमोर येताच त्यांनी अचानक शेतात बसकण मारली. त्या रानातली पांढुरकी माती त्यांनी आपल्या हाताच्या दोन्ही मुठींमध्ये भरली. मुठीत माती भरुन कवी हृदयाचे यशवंतराव हमसुन हमसुन रडायला लागले.

यशवंतरावांची ही अवस्था पाहुन सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची एकच तारांबळ उडाली. यशवंतरावांच्या भावनेचा पहिला पुर ओसरल्यानंतर आपल्या ओघळत्या अश्रुंना कसाबसा बांध घालत ते जमलेल्या उपस्थितांना सांगु लागले,

‘दोस्तहो, हीच ती पवित्र माती, राष्ट्रसंकट उद्भवल्यावर त्याविरोधात कसे लढावे. शत्रुला कसे भिडावे याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे. आमच्या महाराष्ट्रभुमीतल्या प्रत्येक घराघरामधला वीर इथे कोसळला आहे. त्यांच्या रक्तामांसानीच या मातीचे पवित्र भस्मात रुपांतर झाले आहे’