आणि काय हवं? ३: मुरलेल्या नात्याचा सहज सुंदर प्रवास

संयत मांडणीमुळेच सीरिजमधील पात्रं आणि प्रसंग खरेखुरे वाटतात.
priya umesh
priya umesh

सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अशा प्रकारे मुरत चाललेल्या नात्यांमधली गंमत काही वेगळीच असते, पण ती टिकवायची तर नात्यातलं साचलेपण अलगद बाजूला सारत आयुष्य प्रवाही होऊ देणं गरजेचं असतं. आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टी, हलकेफुलके क्षण आणि आलेल्या संकटांत नात्यांची वीण घट्ट कशी ठेवायची, हे पाहण्यासाठी साकेत-जुईच्या (Umesh Kamat - Priya Bapat) संसारात डोकवायला हरकत नाही. साकेत-जुईच्या संसारातल्या या मोजक्या, पण महत्त्वाच्या क्षणांचा अनुभव देणाऱ्या ‘आणि काय हवं?’ Aani Kay Hava 3 या वेब सीरिजचा तिसरा सिझन नुकताच ‘एमएक्स प्लेअर’वर प्रदर्शित झाला आहे. आधीच्या दोन्ही सिझनप्रमाणे लेखन, दिग्दर्शन, संवाद आणि अभिनय अशा पातळ्यांवर सीरिजने चांगली कामगिरी केली आहे.

साकेत-जुईच्या लग्नाला आता पाच वर्षं झालीत. त्यामुळे एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी दोघांनाही चांगल्याच समजल्यात. त्यांच्या नात्यामधला समजूतदारपणा, प्रेम वाखाणण्याजोगं आहेच, पण दिवसभर ऑफिसमधील कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या या जोडप्याला आता कुठे तरी काही तरी खुपायला सुरुवात झालीय. रोजच्या जीवनातला तोचतोचपणा, खाण्यापिण्याचे पर्याय, गप्पांचे विषय या सगळ्यांमध्ये बदल घडवून आणायचा आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. कधी आईच्या सांगण्यावरून साड्यांची खरेदी करायला बाहेर पडणं, कधी बहिणी-भावांच्या मुलांना राहायला बोलावणं, ऑफिसचे विषय घराबाहेर ठेवणं यांमधून नात्यांमधला टवटवीतपणा टिकवण्याचे दोघांचे प्रयत्न दिसतात. कोरोनाच्या संकटाचं सावट या दोघांच्या घरावरही पडलंय. कामं रेंगाळल्यामुळे साकेतला येणारा ताण, जुई आणि तिच्या चुलतबहिणीमधला वाद या गोष्टी त्यांच्या संसारात काही काळ खळबळ माजवतात... अशा प्रसंगांना जुई-साकेत नेमकं कसं सामोरे जातात ते या सीरिजमध्ये पाहायला मिळतं.

सीरिजचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मांडणीतील सहजता. एका तरुण जोडप्याच्या दैनंदिन आयुष्यातले साधेसुधे क्षण असो की कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीतील हतबलता असो, या प्रसंगांची कुठल्याही फिल्मी मालमसाल्याशिवाय साधी सोपी मांडणी केली गेलीय. प्रत्येक भागात काही तरी संदेश देण्याचा अट्टहास नाही, शब्दबंबाळ संवाद नाहीत... अशा संयत मांडणीमुळेच सीरिजमधील पात्रं आणि प्रसंग खरेखुरे वाटतात.

priya umesh
पहिल्यांदाच फडामध्ये ‘पाऊले चालती पंढरीची वाट...’

सीरिजमधला एक भाग मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास या विषयावर आहे. हळूहळू का होईना, पण यासारख्या विषयांवर आता मोकळेपणाने बोललं जातंय... शिवाय या त्रासाकडे गांभीर्याने पाहिलं जातंय हे स्वागतार्ह आहे. त्यात काय आहे बाऊ करण्यासारखं, हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य उच्चारण्याऐवजी एखादीला त्या काळात होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे या भागात दाखवण्यात आलंय.

येणाऱ्या संकटांना घाबरून मनाविरुद्ध उपाय करण्यापेक्षा मन खंबीर करा, हे सांगणारा गृह-ताऱ्यांचा भाग विशेष लक्षात राहतो तो त्यातील मार्मिक संवादांमुळे. लेखन-दिग्दर्शनासोबत सीरिजची मुख्य जमेची बाजू म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा सहजसुंदर अभिनय. नात्यातील गोडवा आणि गुंता मांडण्यात दोघंही कमालीचे प्रभावी ठरलेत. एकंदरीत, सध्याच्या परिस्थितीतलं मानसिक स्वास्थ्याचं महत्त्व आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका सुंदर नात्याचा हा प्रवास निश्चितच पाहण्यासारखा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com