
Jogi Movie News १९८४ ची शीख विरोधी दंगल लक्षात असेलच. या दंगलीवर आधारित चित्रपट जोगी येणार आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) मुख्य भूमिकेत असणार आहे. ‘ही घटना म्हणजे नरसंहार’ असा दिलजीत दोसांझ म्हणाला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शीख अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर दिल्ली आणि देशाच्या इतर भागात हिंसाचाराचा भडका उडाला होता. भारतात तीन हजार शीख मारले गेले होते. यातही सर्वाधिक मृत्यू दिल्लीत झाले होते.
‘याला दंगल म्हणू नका. योग्य शब्द नरसंहार आहे. लोकांमध्ये दुतर्फा भांडण झाले की दंगल होते. माझ्या मते याला नरसंहार म्हटले पाहिजे’ असे त्याचवर्षी जानेवारीत जन्मलेला दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) एका मुलाखतीत म्हणाला. अली अब्बास जफर दिग्दर्शित जोगी चित्रपट महात्मा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय राजधानीतील शीख समुदायाच्या व्यथा सांगतो.
‘हे एक किंवा काही लोकांच्या बाबतीत घडले असे नाही. आपल्या सर्वांसह एकत्रितपणे घडले आहे. मी काही घटनांबद्दल बोललो तर ते वैयक्तिक असेल. आम्ही चित्रपटात एकत्रितपणे याबद्दल बोलत आहोत. मी जन्मल्यापासून त्याबद्दल ऐकत आलो आहे. आम्ही अजूनही जगत आहोत’ असेही दिलजीत दोसांझ म्हणाला.
शुक्रवारपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध
जोगी चित्रपट शुक्रवारपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. दोसांझ, मोहम्मद झीशान अय्युब आणि हितेन तेजवानी यांनी साकारलेल्या तीन मित्रांच्या लढाऊ भावनेचा एक रोमांचकारी आणि भावनिक प्रवास चित्रपटातून पाहायला मिळेल.
चित्रपट वेगळा प्रभाव टाकेल
१९८४ मध्ये घडलेल्या घटनांचा हा सामूहिक दृष्टिकोन आहे. हा चित्रपट सामूहिक आहे. आम्ही सर्वांनी बऱ्याच कथा ऐकल्या आहेत. आयुष्यात असे काही घडू शकते यावर विश्वास बसत नाही. हा चित्रपट देखील त्याच गोष्टींबद्दल बोलत आहे जे ऐकत मोठे झालो. हा चित्रपट प्रत्येकावर वेगळा प्रभाव टाकेल, असे दिलजीत दोसांझ म्हणाला.
अशा विषयांवरही चित्रपट केले पाहिजेत
जे काही घडले ते प्रत्येकाने पाहावे. आम्ही नेहमीच सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. सर्वांना इतिहासाची माहिती असली पाहिजे. सिनेमा हे एक माध्यम आहे, जिथे आपण हलकेफुलके आणि मजेदार चित्रपट बनवतो. परंतु, इतिहासातील अशा विषयांवरही आपण चित्रपट केले पाहिजेत, असे दिलजीत दोसांझ म्हणाला. कुमुद मिश्रा व अमायरा दस्तूर यांनीही हिमांशू किशन मेहरा यांच्यासह मुख्य भूमिका साकारल्या आहेत.